लेखी परीक्षेसाठी बेळगावचे उमेदवार अधिक : बिदर येथील जिल्हा नेहरू स्टेडियमवर भरती प्रक्रिया उत्साहात
प्रतिनिधी /बेळगाव
बिदर येथे 5 ते 22 डिसेंबरदरम्यान अग्निवीर सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले होते. या सैन्य भरतीसाठी 46 हजार 442 उमेदवारांपैकी 3 हजार 7 उमेदवार शारीरिक चाचणीत उत्तीर्ण झाले. या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात आले आहे.
बिदर, बेळगाव, यादगीर, रायचूर, कोप्पळ, कलबुर्गी या जिल्ह्यांसाठी 5 ते 22 डिसेंबरदरम्यान सैन्य भरती प्रक्रिया पार पडली. या भरतीसाठी उमेदवार उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. अग्निपथ योजनेंतर्गत बिदर येथील जिल्हा नेहरू स्टेडियमवर ही भरती प्रक्रिया झाली. सहा जिल्ह्यांतून 70 हजार 375 उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरले होते. यापैकी 46 हजार 442 उमेदवारी शारीरिक चाचणीसाठी सहभागी झाले होते. यातील 3 हजार 7 उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. तर 23 हजार 933 उमेदवार गैरहजर राहिले आहेत.
बिदर जिल्ह्यातील 104, रायचूर 70, कोप्पळ 158, कलबुर्गी 180, बेळगाव 2240 आणि यादगीर जिल्ह्यातील 255 उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड झाली आहे. अद्याप लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले नाही. त्यामुळे लेखी परीक्षा देणारे उमेदवार वेळापत्रकाच्या प्रतीक्षेत आहेत. विशेषत: बेळगाव जिल्ह्यातील या भरतीसाठी युवक अधिक प्रमाणात दाखल झाले होते. त्याप्रमाणे लेखी परीक्षेसाठीही बेळगाव जिल्ह्यातील उमेदवारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे भावी सैनिकांचे भवितव्य आता लेखी परीक्षेवरच अवलंबून आहे.
बेळगावचे कर्नल ए.आर.ओ. निशांत शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आठ दिवस सैन्य भरती प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत 25 वरिष्ठ अधिकारी आणि दीडशे लष्करी जवानांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या भरती प्रक्रियेला बिदर जिल्हा प्रशासनाने योग्य सहकार्य केले, अशी माहिती वरिष्ठ अधिकारी डॉ. गौतम अरळी यांनी दिली.
सहा जिल्ह्यांतील लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवार
- जिल्हे उमेदवार
- बिदर 104
- रायचूर 70
- कोप्पळ 158
- कलबुर्गी 180
- बेळगाव 2240
- यादगिर 255
- एकूण 3007
- भरतीसाठी अर्ज केलेले उमेदवार 70375
- भरतीत सहभागी उमेदवार 46442
- लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवार 3007
- भरतीसाठी गैरहजर उमेदवार 23933