हिंदू जनजागृतीतर्फे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
नववर्षाच्या स्वागताच्या आदल्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबर रोजी मध्यरात्री गैरप्रकार तसेच समाजविघातक घटना घडत आहेत. त्याला आळा घालणे तसेच विद्यार्थ्यांना प्रबोधन करणे, ही काळाची गरज आहे. तेव्हा तातडीने त्यावर निर्बंध घालावेत आणि जनजागृती करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राष्ट्रध्वज, राष्ट्रीय प्रतिके तसेच संस्कृतीची विटंबना केली जात आहे. 31 डिसेंबर रोजी धूम्रपान, मद्यपान, अमलीपदार्थांचे सेवन करून भरधाव वाहने चालविणे यामुळे लहान-मोठे अपघात घडत असतात. रात्रभर फटाके उडविले जातात. डीजे लावून नाचगाणी केली जातात. तरुणी, महिलांची छेडछाड असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे पोलिसांवरदेखील ताण येतो. गेल्या काही वर्षांमध्ये असे प्रकार वाढले असून त्याबाबत प्रशासनानेच आता जनजागृती करणे गरजेचे आहे. तेव्हा तातडीने याबाबत जनजागृती करावी, तसेच 31 डिसेंबरच्या रात्री कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमांना परवानगी देऊ नये, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.