प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन जाहीर केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी बेळगाव शहर व जिल्हय़ात सध्या जारी असलेला 31 मे पर्यंत जमावबंदीचा आदेश वाढविला आहे.
तिसऱया टप्प्यातील लॉकडाऊन रविवारी मध्यरात्री संपुष्टात येतो. यापूर्वीच्या आदेशानुसार 17 मे च्या मध्यरात्रीपर्यंत बेळगाव शहर व जिल्हय़ात सीआरपीसी कलम 144 अन्वये जमावबंदीचा आदेश जारी होता. आता रविवारी मध्यरात्रीपासून 31 मे च्या मध्यरात्रीपर्यंत जमावबंदी वाढविण्यात आली आहे.
रोज सायंकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत अनावश्यक फिरण्यावर या आदेशानुसार बंदी असणार आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात सायंकाळी 7 नंतर अधिक जण गटागटाने फिरू नये. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 188 अन्वये कारवाई करण्याचा इशाराही जिल्हा दंडाधिकाऱयांनी दिला आहे.