योजनेच्या कामाबाबत दर आठवड्याला आढावा बैठक घ्या -आमदार सतेज पाटील यांच्या सूचना; शासकीय विश्रामगृहावर अधिकारी लोकप्रतिनिधीसोबत बैठक
उचगाव / प्रतिनिधी
३४४ कोटींची गांधीनगर नळ पाणीपुरवठा योजना ही दक्षिण विधानसभा मतदार संघातील १३ गावांमधील नागरिकांचे भविष्य घडवणारी योजना आहे. ती नियोजित कालावधीत व दर्जेदार होणे गरजेचे आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी एकत्रित प्रयत्न करावेत, दर आठवड्याला आमदार ऋतुराज पाटील यांच्या सोबत आढावा बैठक घ्याव्यात अशा सूचना आमदार सतेज पाटील यांनी केल्या आहेत. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या आढावा बैठकीत गुरूवारी ते बोलत होते.
जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत गांधीनगरसह १३ गावांसाठीच्या सुधारित नळ पाणी पुरवठा योजनेसाठी ३४४ कोटीचा निधी मंजूर आहे. या योजनेच्या कामाचा शुभारंभ लवकरच करण्यात येणार असून याबाबत आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, गांधीनगर नळपाणी योजना २०२४ पर्यंत पूर्ण होणे गरजेचे आहे. मुदतीमध्ये काम पूर्ण करण्यासाठी स्थनिक लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकारी यांनी एकत्रित प्रयत्न करावेत, स्थनिक पातळीवरील समस्या त्याच ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करा. सध्या अस्तित्वात असलेल्या योजनेच्या पाईपलाईनचा आराखडा तयार करा, नवीन योजनेसाठी कोठे पाईप घालावे लागणार याचा ग्रामसेवकानी अभ्यास करावा, योजनेसाठी रस्त्यांची खोदाई करावी लागणार नाही याची काळजी घ्यावी आशा सूचना आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केल्या. योजनेचे काम नियोजित कालावधीत पूर्ण होण्याच्या दृष्टीने जुनी टाकी निर्लेखन, जमीन संपादन प्रस्ताव तातडीने पाठवा. शासन स्तरावर मी आणि आमदार ऋतुराज पाटील पाठपुरावा करू अशी ग्वाही देखील आमदार सतेज पाटील यांनी दिली.
या योजनेच्या देखभाल व दुरुस्तीकरिता योजनेच्या किमतीच्या १० टक्के हिस्सा ग्रामपंचायतीचा राहणार आहे. ही रक्कम भरण्यासाठी ग्रामपंचायतीनी आतापासून प्रयत्न करावेत अशा सूचनाही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केल्या. दरम्यान, पुढील ३० वर्षांचा विचार करून या योजनेची आखणी करण्यात आली आहे अत्यंत महत्त्वाची असलेली योजना या १३ गावांमध्ये विकासामध्ये निश्चितच महत्वाचे योगदान देईल. त्यामुळे ही योजना उत्कृष्ट पद्धतीने कार्यान्वित व्हावी यासाठी सर्वांनी पाठपुरावा करावा असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी या बैठकीत केले.
या बैठकीत संबंधित सर्व गावांचे सरपंच व ग्रामसेवकानीही सूचना मांडल्या. आमदार सतेज पाटील यांनी याबाबत मंत्रालय स्तरावरून आवश्यक असलेल्या प्रक्रियेसाठी आपण व आमदार ऋतुराज पाटील पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली. भविष्यातील लोकसख्या व पाण्याची गरज लक्षात घेऊन आमदार ऋतुराज पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली या पाणी योजनेसाठी ३४४ कोटींची ऐतिहासिक मंजुरी मिळवली आहे. त्यामुळे दोघांच्याही अभिनंदनाचा ठराव पाचंगावचे माजी सरपंच संग्राम पाटील यांनी मांडला. सर्व लोकप्रतिनिधिनी टाळ्यांच्या गजरात त्याला पाठिंबा दिला.
या बैठकीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अमित पाथरवट, जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर, देवस्थान समिती सचिव शिवराज नाईकवाडे, तहसीलदार शीतल मुळे, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता एस आर पाटील, पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता डी के गायकवाड, नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण , लोकनियुक्त सरपंच प्रियांका पाटील,मधुकर चव्हाण, उत्तम आंबवडे, अमर मोरे, शुभांगी आडसूळ, चंद्रकांत डावरे, सुनीता गुरव, संदिप पाटोळे, अश्विनी शिरगावे, दत्तात्रय पाटील, संग्राम पाटील, रूपाली कुसाळे, निशांत पाटील, ए व्ही कांबळे कांबळे यांच्यासह योजनेत समाविष्ट गावांचे उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक उपस्थित होते.