बेंगळूचे के. व्ही. चंद्रकांत यांनी एक अनोखा विक्रम केला आहे. त्यांनी गेल्या 35 वर्षांमध्ये तब्बल 200 वेळा रक्तदान केलं आहे. त्यांचा रक्तगट ओ पॉझिटिव्ह असा असून रक्तदान हीच आपली समाजसेवा असल्याचे ते मानतात. बेंगळूर येथील अत्याधुनिक रडार बनविण्याच्या सरकारी कारखान्यात ते उच्च पदावर आहेत. केवळ रक्तच नव्हे तर त्यांनी आजपर्यंत अनेकदा सिंगल डोनर प्लेटलेट (एसडीपी), ग्रॅन्युलोसोईटस् आणि मूलपेशींचेही दान पेले आहे.
सरकारी नियमानुसार एक सुदृढ व्यक्ती तीन महिन्यांमधून एकदा रक्तदान करू शकते. तसेच आठवडय़ातून दोनदा इतर रक्तघटक दान करू शकते. मात्र इतर रक्तघटक वर्षातून जास्तीतजास्त 24 वेळा दान करता येतात. चंद्रकांत यांनी 35 वर्षांमध्ये 200 वेळा, म्हणजेच वर्षातून चार ऐवजी जवळपास सहा वेळा रक्तदान केले आहे. ज्याला रक्ताची आवश्यकता आहे, त्याला ते अशा प्रकारे साहाय्य करतात. गेल्या दहा वर्षांमध्येच त्यांनी 100 वेळा रक्तदान केले आहे. वयाच्या 21 वर्षापासून त्यांनी रक्तदान करण्यास प्रारंभ केला. एवढय़ा वेळा रक्तदानाची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली या प्रश्नावर त्यांचे उत्तर असे आहे की, अनेकदा आपण लोकांना रक्तासाठी धावाधाव करताना पाहतो. रक्त न मिळाल्याने उपचाराधीन व्यक्तीचे नातेवाईक अक्षरशः रडकुंडीला आलेले मी पाहिले आहेत. त्यांचे दुःख शक्य तितके दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निश्चय आपण केला. त्यातूनही ही प्रेरणा मिळाली. आपल्या देशात इतके निरोगी लोक असताना रक्तासाठी कोणाला वणवण करावी लागूच नये. तथापि, आपल्या देशात रक्तदानासंबंधी अनेक अपसमजुती आहेत. त्यामुळे सक्षम लोकही रक्त देण्यात तयार नसतात. आपल्या या वृत्तीत बदल झाल्यास अनेकांचे जीव वाचतील, असे ते म्हणतात.