लोकांकडून घरपट्टी, व्यवसायिक कर भरणा नाही : वसुलीसाठी पथक नेमून धडक मोहीम राबविणार
प्रतिनिधी / पणजी
राजधानी पणजीतील रहिवाशी, व्यावसायिक घरपट्टी व इतर कर भरत नाहीत. त्यांची सुमारे रु. 35 कोटीची थकबाकी शिल्लक असून ती वसुली करण्यासाठी पणजी महापालिकेने 5 ते 6 जणांचे पथक नेमण्याचे ठरविले असल्याची माहिती महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिली. दर महिन्याला रु. 2 कोटीची वसुली करण्याचे ध्येय ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
पणजी महापालिकेची काल बुधवारी मनपा सभागृहात सर्वसाधारण बैठक झाली. त्यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत महापौरांनी मनपा बैठकीतील निर्णयाची माहिती पत्रकारांना दिली.
ते म्हणाले की, राजधानीतील 50 टक्के लोक, व्यावसायिक घरपट्टी व इतर कर भरणा करत नाहीत. त्यामुळे सुमारे 35 कोटीची कर थकबाकी प्रलंबित आहे. हा एक प्रकारे पणजी मनपाचा महसूल असून तो बुडता कामा नये, तर त्याची वसुली झालीच पाहिजे, असे मोन्सेरात यांनी सांगितले.
मिरामार सर्कलकडे ‘पे पार्किंग’ येणार असून त्यासाठी मनपाच्या बहुतेक सदस्यांनी होकार दर्शविला, परंतु आजूबाजूला असलेल्या लहान गावातील रस्त्यांवर पे पार्किंग करू नये, असे मत उदय मडकईकर यांनी व्यक्त केले.
‘ज्ञान सेतू’वरुन वादंग
पाटो संस्कृती भवनकडे बांधण्यात आललेला ‘ज्ञानसेतू’ म्हणजे प्रेमिकांचा, दारुडय़ांचा अड्डा बनल्याची टींका मडकईकर यांनी केली. तेथे पुरेशी प्रकाश योजना नसल्याची तक्रारही त्यांनी केली. शुभम चोडणकर यांनी मात्र ‘ज्ञानसेतू’बद्दल सरकारचे व पणजी मनपाचे कौतुक केले. त्यावरून दोघांमध्ये थोडा वाद रंगला
मार्केटच्या बाजूची इमारत असुरक्षित जाहीर करा!
पणजी मार्केटला लागून असलेली इमारत असुरक्षित बनली असून ती तशी जाहीर करावी आणि तेथील भाडेकरूंना सुरक्षित स्थळी हलवावे, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. त्यावर विचार करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. पणजी मनपा इमारतीचा मागील भाग तेथील दुकानदार, रहिवाशी यांना विश्वासात घेऊन व त्यांनी इतर ठिकाणी जागा देऊन पाडण्यात येणार असून नवीन इमारतीसाठी मार्ग मोकळा करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.