प्राप्तीकर विभागाच्या धाडीनंतर खासदाराचा दावा
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रांची आणि इतर स्थानी प्राप्तीकर विभागाने काँग्रेसचे राज्यसभा सदस्य धीरज प्रसाद साहू यांच्याशी संबंधित स्थानांवर धाडी घालून 350 कोटी रुपयांची रोख रक्कम हस्तगत केल्याच्या घटनेनंतर चार दिवसांनी साहू यांची प्रथम प्रतिक्रिया समोर आली आहे. ही रक्कम काँग्रेस किंवा कोणत्याही राजकीय पक्षाची नाही, अशी सारवासारवी त्यांनी केली आहे. ही रक्कम आपली स्वत:चीही नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, आता हे प्रकरण ईडीकडे जाण्याची शक्यता आहे.
साहू यांच्याशी संबंधित अनेक स्थानांवर धाडी घालण्यात आल्या होत्या. जवळ पास एक आठवडाभर ही कारवाई चालली होती. नोटांची गणती करण्यासाठी 27 यंत्रे कामाला लावण्यात आली होती. काही यंत्रे अतिउपयोगामुळे गरम होऊन बंदही पडली होती. 350 कोटी रुपयांहून अधिक रक्कम मोजण्यासाठी सलग पाच दिवस लागले होते. साहू यांनी ही रक्कम त्यांची नाही असे सांगितले असले तरी एवढी रोख रक्कम त्यांच्याशी संबंधित स्थानी ठेवली कोणी, याचे उत्तर त्यांनी दिलेले नाही. मात्र, ही रक्कम व्यवसायातून मिळाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ती त्यांच्या नातेवाईकांची आहे, असाही त्यांचा दावा आहे. सध्या आपण कोणताही व्यवसाय करत नसून पूर्णवेळ राजकारणात आहोत. नातेवाईक आपला दारुचा धंदा सांभाळतात. त्यामुळे ती त्यांची रक्कम असावी असे त्यांचे म्हणणे आहे.
प्राप्तीकर विभागाकडून शोध
साहू यांनी कोणताही दावा केला असला तरी प्राप्तीकर विभागाकडून या अफाट संपत्तीच्या स्रोताचा शोध घेण्याचे काम केले जात आहे. प्राप्तीकर विभागाची ही आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी धाड आहे. हा काळा पैसा आहे काय याचाही शोध घेतला जात आहे. साहू यांनी ही रक्कम नातेवाईकांची असावी, अशी शक्यता व्यक्त केलेली असली, तरी आतापर्यंत त्यांचा एकही नातेवाईक या संपत्तीवर दावा सांगण्यासाठी पुढे आलेला नाही. त्यामुळे साहू यांचे स्पष्टीकरण संशयाच्या भोवऱ्यात आहे. सध्या ही रक्कम बँकेत जमा करण्यात आली आहे.