आंदोलनस्थळांवर उद्या जल्लोष करून शेतकरी माघारी फिरणार : परतीच्या प्रवासासाठी आवराआवर सुरू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी तब्बल 378 दिवसांपासून दिल्लीच्या सीमावर सुरू असलेले शेतकऱयांचे आंदोलन मागे घेण्याची अंतिम घोषणा गुरुवारी करण्यात आली. संयुक्त किसान मोर्चाने आंदोलन स्थगित केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. आंदोलन स्थगितीची घोषणा करताना संयुक्त किसान मोर्चाने डॉक्टर, वकील, सोशल मीडिया, माध्यमे, कलाकार यांचे आभार मानले आहेत. आंदोलनाच्या यशाचा जल्लोष शनिवारी सर्व धरणेस्थळांवर, टोल नाक्मयांवर केल्यानंतर 11 डिसेंबरला सर्व शेतकरी आंदोलक माघारी फिरणार आहेत. संयुक्त किसान मोर्चा यापुढे आणखी मजबूत केला जाणार आहे. संयुक्त किसान मोर्चाची पुढील बैठक 15 जानेवारी रोजी दिल्लीत होणार आहे.
केंद्र सरकारकडून आलेल्या लेखी प्रस्तावावर एकमत झाल्यानंतर शेतकरी संघटनांकडून गुरुवारी आंदोलन संपवण्याची घोषणा करण्यात आली. शेतकऱयांच्या प्रलंबित मागण्यांबाबत कृषी सचिवांच्या स्वाक्षरीने शासनाकडून पत्र पाठविण्यात आले होते. त्यानंतर संयुक्त किसान मोर्चाने बैठक घेतली. बैठक संपल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा करण्यात आली. तसेच आंदोलनाच्या यशाचे श्रेय हुतात्मा शेतकऱयांना समर्पित करण्यात येत आहे, अशी माहिती संयुक्त किसान मोर्चाच्या प्रतिनिधींनी प्रसारमाध्यमांना दिली. शेतकऱयांच्या आंदोलनाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली. अनेक हॉलिवूड कलाकारांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. देशातही या आंदोलनामुळे अनेक घटना घडल्या. अखेर बळीराजासमोर सरकार झुकले अन् पंतप्रधान मोदींनी कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली होती. पण जोपर्यंत कायदे घटनात्मक पद्धतीने रद्द होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्यावर शेतकरी संघटना ठाम होत्या. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीतही कृषी कायदे मागे घेण्यासाठी मांडण्यात आलेल्या विधेयकावर शिक्कामोर्तब झाले आहे. लोकसभा आणि राज्यसभेत हे विधेयक संमत झाले आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर हे कायदे घटनात्मकरित्या रद्द झाल्यामुळे शेतकऱयांच्या वर्षभर चाललेल्या लढय़ाला मोठे यश मिळाले आहे. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी राकेश टिकैत यांनी सरकारसोबत तब्बल वर्षभराहून अधिक काळ टक्कर दिली.