अन्न-नागरी पुरवठा खात्याची कारवाई : बोगस रेशनकार्डे रद्द, रेशनकार्डे जमा करण्याचे आदेश देऊनही साफ दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
खोटी माहिती पुरवून रेशनकार्ड मिळविलेल्या जिल्हय़ातील 38 हजार बोगस रेशनकार्डधारकांना अन्न व नागरी पुरवठा खात्याने दणका दिला आहे. संबंधित बेकायदेशीर रेशनकार्ड मिळविलेल्या शिधापत्रिकाधारकांची रेशनकार्डे रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये विशेषतः आर्थिकदृष्टय़ा सक्षम आणि सरकारी नोकरांचा समावेश असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, कारवाई केलेल्या रेशनकार्डधारकांची कार्डे रद्द करून दंड वसूल करण्यात आला आहे.
आर्थिकदृष्टय़ा सक्षम असूनदेखील खोटय़ा कागदपत्रांची पूर्तता करून रेशनचा लाभ घेणाऱया कार्डधारकांची संख्या अधिक आहे. दरम्यान, अशा कार्डधारकांना कार्डे जमा करावी, असा आदेश अन्न व नागरी पुरवठा खात्याने दिला होता. मात्र, याकडे दुर्लक्ष करून संबंधित रेशनकार्डधारक रेशनचा लाभ घेत होते. अशांवर खात्याने कारवाई करून त्यांची रेशनकार्डे रद्द केली आहेत. जिल्हय़ात 38 हजार 907 बेकायदेशीर कुटुंबीयांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
सरकारी नोकर, आयकर भरणारे, ग्रामीण भागात 3 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेले, शहरात एक हजार चौरस फुटापेक्षा मोठे घर असलेले आणि चारचाकी वाहनधारक असलेल्या बेकायदेशीर कार्डधारकांवर कारवाई झाली आहे. शासनाच्या डोळय़ात धूळ फेकून आणि खोटय़ा कागदपत्रांची पूर्तता करून रेशनचा लाभ घेणे सुरू होते. अशा बेकायदेशीर कार्डधारकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. शिवाय त्यांना एपीएल कार्डे वितरित करण्यात येत आहेत.
दारिद्रय़ रेषेखालील जनतेला धान्य उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाकडून मोफत धान्याचा पुरवठा केला जातो. शिवाय कोरोना काळापासून केंद्र सरकारकडून पाच किलो तांदूळ अतिरिक्त दिला जात आहे. त्याबरोबर राज्य सरकारकडून पाच किलो तांदूळ वितरित केला जात आहे. त्यामुळे प्रत्येकी दहा किलो तांदूळ दिला जात आहे. या अतिरिक्त धान्याचा लाभ काही सधन कुटुंबे उचलत असल्याचे समोर आले होते. अशा बोगस कार्डधारकांचा शोध घेऊन खात्याने त्यांच्यावर कारवाई केली आहे. त्यामुळे बोगस कार्डधारकांना आता चाप बसणार आहे.
जिल्हय़ात 2019-20 मध्ये 10 हजार 175 अपात्र रेशनकार्डधारकांची कार्डे रद्द करून त्यांच्याकडून 42 लाख 63 हजार 359 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. 2020-21 मध्ये 709 अपात्र रेशनकार्डधारकांकडून 12 हजार 768 रुपये दंड वसूल झाला आहे. 2021-22 मध्ये 22 हजार 983 अपात्र रेशनकार्डधारकांकडून 2 लाख 41 हजार 5 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर 2022-23 मध्ये 5 हजार 34 अपात्र रेशनकार्डधारकांवर कारवाई करून 1 कोटी 39 लाख 57 हजार 999 रुपये वसूल करण्यात आले आहेत.
भाजारभावानुसार दंडही वसूल
बेळगाव जिल्हय़ातील अपात्र कुटुंबीयांवर कारवाई केली जात आहे. त्यांच्या शिधापत्रिका रद्द केल्या जात आहेत. आतापर्यंत 38 हजार अपात्र बीपीएल कार्डधारकांवर कारवाई झाली आहे. त्याबरोबरच बाजारभावानुसार दंडही वसूल करण्यात आला आहे.
– श्रीशैल कंकणवाडी (सहसंचालक अन्न व नागरी पुरवठा खाते)