सुप्रसिद्ध साहित्यिकांची लाभणार उपस्थिती : नितीन सावंत भूषविणार संमेलन अध्यक्षपद
वार्ताहर /कडोली
मराठी साहित्य संघ कडोली, सांगाती साहित्य अकादमी बेळगाव, अक्षरयात्रा दै. तरुण भारत बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कडोली येथे रविवार दि. 8 जानेवारी 2023 रोजी 38 वे कडोली मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनासाठी सुप्रसिद्ध साहित्यिक पुढीलप्रमाणे लाभणार असून त्यांचा परिचय खालीलप्रमाणे आहे.
संमेलन उद्घाटक : यल्लोजीराव तानाजी पाटील
यल्लोजीराव पाटील हे कंग्राळी बी. के. ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच भांदुर गल्ली बेळगाव येथील पाटील क्रिएशन्स या फर्मचे ते मालक आहेत. दरवर्षी ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करतात. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करतात. कोविडच्या काळात त्यांनी लोकांना बरीच मदत केली आहे. गावच्या शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा आदी कार्यात त्यांचा सहभाग असतो.
संमेलनाचे अध्यक्ष : नितीन सावंत
सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहून लेखक, साहित्यिक, कीर्तनकार, प्रवचनकार तथा व्याख्याते म्हणून नितीन सावंत यांनी सर्वत्र नावलौकिक मिळविला आहे. 2009 पासून देशभरात त्यांनी अनेक व्याख्याने, कीर्तन, प्रवचने दिली असून 2014 साली प्रा. मा. म. देशमुख उत्कृष्ट लेखक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. निवृत्ती पब्लिकेशनचे प्रकाशक तथा मानव मुक्ती मिशन पब्लिकेशनच्या संपादकांबरोबर अनेक पुरोगामी पक्ष संघटनांचे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांची नामायण, जातवर्ग, स्त्रीदास्यांताचा अनन्य साहित्यिक अविष्कार, नाऱ्याची मंजू, कुशीचे लग्न, तुकोबारायास पत्र, संत जनाबाई यांचा अभंग गाथा संपादित, परशुराम ते नथुराम, एक ऑगस्ट हाच स्वर्ग, मराठी भाषा दिन आणि 14 पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
व्याख्याते : डॉ. संजय कळमकर
डॉ. संजय कळमकर यांनी कथा, कादंबरी, एकांकीका, नाटके, चित्रपट कथा असे सर्वस्पर्शी लेखन केले आहे. त्यांच्या युवकांची अस्वस्थता दाखवणाऱ्या भग्न या कादंबरीला पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील साहित्य पुरस्कार, टोपीवाले कावळे या कादंबरीला गोविंदराव आदिक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, बे एक बे या कथासंग्रहास चौथे शिवाजी महाराज राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, शिक्षण क्षेत्राचे वास्तव दाखविणाऱ्या सारांश शुन्य या कादंबरीला वि. स. खांडेकर साहित्य पुरस्कार, देवदासींच्या वेदना दाखवणाऱ्या कल्लोळ या कादंबरीला चतुरस्त्राr साहित्य पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांनी पत्रकार व्यवसायातील उभा अडवा छेद दाखविणारी झुंड ही कादांबरी विशेष गाजली. त्यांच्या या साहित्यिक कामगिरीमुळे त्यांना अनेक विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रभर त्यांचे कथाकथनाचे 1 हजार कार्यक्रम झाले आहेत.
कवी : महेश कराडकर
महेश नामदेव कराडकर यांनी बी. ए. एम. बी. ए. ही प्राप्त करून अनेक संघ संस्थावर विश्वस्त, संचालक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यवाह, संपादक, सल्लागार आदी विविध पदांवर कार्यरत राहिलेले आहेत. हे सर्व करत असताना साहित्य लेखन केले. 2013 मध्ये कबुतर या कविता संग्रहाला अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. दैनिक नवशक्ती मुंबई वृत्तपत्रामध्ये शेळकं-फुलकं पाक्षिक सदर, आकाशवाणी सांगली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मुक्तागा, प्रतिबिंब, प्रभातीचे रंग इ. श्रृतीका मालांचे लेखन, ग्रीब एफएमवर मिस्टर अॅण्ड मिसेस कसनुसकर या श्रृतीकेचे लेखन केले आहे. शिवाय वृत्तपत्रांतून स्तंभ लेखन आणि चित्रपट गीत लेखन केले आहे. 2015 साली झालेल्या 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पंजाबमधील घुमानमध्ये संमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभाग होतो. विशेषकांच्या संपादक मंडळात त्यांचा सहभाग असून सांगली येथे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये कार्यकर्ता म्हणून सक्रिय सहभाग असतो.
कवी : प्रा. नाना हलवाई
प्रा. नाना हलवाई यांनी बी. कॉम आणि एम. ए. ही पदवी प्राप्त केली असून त्यांना उत्कृष्ट साहित्याबद्दल प्रतिष्ठाणतर्फे युवारत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी लघू चित्रपट लेखनाबरोबर चित्रपट अभिनेता आणि निवेदक म्हणूनही काम केले आहे.
कवी : प्रा. डॉ. दिपक स्वामी
आद्य कवयित्री महारंबा चरित्र आणि वाङमय या विषयावर एम. फिल तर शाहीर पठ्ठे बापूराव व्यक्ती आणि वाङमय या विषयावर पीएच. डी पदवी मिळविली असून मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. आकाशवाणी सांगली केंद्रावर चिंतन, काव्य वाचन व घर ठरवले आहे या विषयावर भाषण झाले आहे. त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सहभाग घेण्याबरोबर बालसाहित्य संमेलन व अन्य संमेलनातून निमंत्रित कवी म्हणून काव्य वाचन केले आहे. त्यांना उत्कृष्ट साहित्यामुळे साहित्य गौरव बीड, सावंतवाडी, कोकणरत्न पुरस्कार, साहित्य रत्न पुरस्कार, शिवाजी सावंत पुरस्कार, काव्य पंडीत पुरस्कार, साहित्यसिंधू पुरस्कार, गौरव पत्र, कर्मवीर पुरस्काराबरोबर एकूण 27 पुरस्कार प्राप्त झाले आहेत.