केंद्र सरकारचा मोठा निर्णय – कर्करोग, टीबी अन् मधुमेहावरील औषधे सामील
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारने आवश्यक औषधांच्या यादीत बदल केला आहे. या यादीत आता 39 नव्या औषधांचा समावेश करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे व्यापक स्वरुपात वापरल्या जाणाऱया आवश्यक औषधांच्या किमतीत घट होणार आहे. काही अँटीव्हायरलसोबत कर्करोग, मधुमेह, टीबी आणि एचआयव्हीशी लढणाऱया औषधांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
सरकारने वर्तमान यादीतून 16 औषधांना हटविले आहे आणि अंतिम एनएलईएम 2021 मध्ये आता 399 आवश्यक औषधांची नावे आहेत. प्रत्यक्ष मूल्य नियंत्रणाच्या अंतर्गत ही औषधे असणार आहेत. याचा अर्थ या यादीत असलेल्या सर्व औषधांवर सरकारकडून किंमत मर्यादा घालण्यात आली आहे. यामुळे ही औषधे कमी किमतीत रुग्णांना उपलब्ध होऊ शकतील.
आयसीएमआर अंतर्गत तज्ञांच्या विशेष समितीकडून तयार ही यादी आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांना सोपविण्यात आली आहे. या औषधांचे अंतिम मूल्य नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारसींच्या आधारावर राष्ट्रीय फार्मास्युटिकलकडून निश्चित केले जाणार आहे. त्यानंतरच या औषधांची अंतिम किंमत ठरणार आहे.