1363 जणकोरोनामुक्त : सक्रियरुग्ण 15791
प्रतिनिधी / पणजी
राज्यात गत पाच दिवसात तिसऱयांदा 39 कोरोना रुग्णांचे बळी गेले आहेत. गत दोन आठवडय़ांपासून बाधितांच्या संख्येत दीड ते दोन हजारांच्या दरम्यान चढउतार दिसून येत आहेत तर बळींची आकडेवारीही 30 ते 40 या संख्येभोवतालीच घुटमळत आहे. त्यातच शनिवार ते बुधवार या गत पाच दिवसात चक्क तीन वेळा 39 जणांचे बळी गेले आहेत. वर्षभरातील एकुण मृतांची संख्या बुधवारी 2499 वर पोहोचली आहे.
काल बुधवारी 1487 नवीन बाधित आढळून आले आहेत. गत काही दिवसांपासून ही आकडेवारी दोन हजारांच्या मर्यादेतच स्थीर असल्याचे दिसून आले आहे. सध्या राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या 15791 एवढी आहे. वर्षभरातील रुग्णसंख्येने दीड लाखाचा टप्पा पार केला असून एकूण संख्या 150897 वर पोहोचली आहे. गत 24 तासात 1363 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर आतापर्यंत एकूण 132607 जण बरे झाले आहेत. 165 जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले व 1322 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. बरे होण्याचे प्रमाण 87.88 टक्क्यांवर पोहोचले आहे.
बुधवारी बळी गेलेल्या 39 जणांमधील सर्वाधिक 24 मृत्यू गोमेकॉत झाले आहेत. त्याशिवाय दक्षिण जिल्हा इस्पितळात 6, केपे व कुडचडे या आरोग्य केंद्रात प्रत्येकी एका व्यक्तीस मृत आणण्यात आले, तर दक्षिण गोव्यातील विविध खाजगी रुग्णालयात एकूण सात जण दगावले आहेत. बळींपैकी दोघांनी कोरोनाची पहिली लस तर एका रुग्णाने दोन्ही लसी घेतल्या होत्या. या मृतांमध्ये 30 वर्षीय तरुणापासून 94 वर्षे वयोगटातील रुग्णांचा समावेश आहे. त्यात 28 पुरुष आणि 11 महिला आहेत, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
मडगावात अद्याप चारअंकी रुग्णसंख्या राज्यातील 33 पैकी बहुतेक केंद्रातील रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणात घटत आहे. परंतु मडगाव केंद्रातील रुग्णसंख्या मात्र अद्याप चार अंकीच आहे. बुधवारी तेथे 1502 रुग्ण होते. अन्य केंद्रांपैकी फोंडा केंद्रात 920, चिंबलमध्ये 820, पणजीत 817 व कांदोळीत 801 रुग्ण आहेत. अन्य सर्वत्र त्यापेक्षा कमी आहेत. सर्वात कमी 111 रुग्ण कासारवर्णे केंद्रात आहेत.