प्रतिनिधी/ .बेळगाव
टिळकवाडी येथील तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलाचे उद्घाटन होऊन दोन महिने होण्यापूर्वीच या ठिकाणी समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. उद्घाटनापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या ओव्हरब्रिजवर रात्रीच्यावेळी पथदीप सुरू केले जात नसल्याने अंधार पसरत आहे. यामुळे अनेक अपघात उड्डाण पुलावर होत असून, एखाद्या निरपराध्याचा जीव जाण्यापूर्वी पथदीप सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
तिसरे रेल्वेगेट येथे नैर्त्रुत्य रेल्वेकडून उड्डाणपूल उभारण्यात आला. उद्घाटनापासून या उड्डाणपुलावर पथदीपांची व्यवस्था नसल्याने टीकेची झोड उठविण्यात आली होती. खानापूर रोड मार्गे शहरात येणारे वाहनचालक या उड्डाणपुलाचा वापर करतात. आधीच उड्डाणपूल अऊंद असून, त्यात आता पथदीप नसल्याने रात्रीच्यावेळी वाहने चालवताना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
रात्रीच्यावेळी घडताहेत अपघात
उड्डाणपुलावर वळण असल्याने भरधाव येणाऱ्या वाहनांचा अपघात होत आहे. पथदीप नसल्याने वळण निदर्शनास न आल्याने वाहने थेट भिंतीला आदळली जात आहेत. दोन दिवसापूर्वी कारवरील नियंत्रण सुटल्याने उड्डाण पुलावर एक भीषण अपघात झाला होता. इतके होऊनही या ठिकाणी अद्याप पथदीप सुरू करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वाहनचालकांचा अंधारातूनच प्रवास सुरू आहे.
शहरातील उड्डाणपुलांची अवस्था दयनीय
रेल्वेकडून शहरात उड्डाणपूल बनविण्यात आले खरे, परंतु या सर्वच उड्डाणपुलांची अवस्था दयनीय आहे. कपिलेश्वर उड्डाणपुलावरील पथदीप मध्यंतरी अनेक महिने बंद होते. गोगटे ओव्हरब्रिज येथेही हीच परिस्थिती होती. जुन्या धारवाड रोडवरील खड्डे बरेच दिवस तसेच होते. रेल्वे, कॅन्टोन्मेंट बोर्ड व मनपामधील समन्वयाअभावी नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.