भाजपच्या आक्रमक प्रचारावर केली मात
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ तृणमूल काँग्रेसने प्रचंड बहुमत मिळवित राज्यात हॅटट्रिक साधली आहे. ममता बॅनर्जी सलग तिसऱयांदा राज्याच्या मुख्यमंत्री होणार आहेत. 292 जागांपैकी तृणमूल काँग्रेसने 202 जागांवर विजय मिळवत भाजपच्या अपेक्षांना सुरुंग लावला आहे. तर मागील विधानसभेत केवळ 3 आमदार असलेल्या भाजपच्या जागांमध्येही प्रचंड वाढ होत हा आकडा 86 वर पोहोचला आहे. राज्यात प्रदीर्घकाळ सत्तेवर राहिलेल्या काँग्रेस आणि डावे पक्ष यांच्यासमोर आता अस्तित्व टिकविण्याचे संकट निर्माण झाले आहे. या दोन्ही पक्षांच्या आघाडीला केवळ 2 जागांवर यश मिळू शकले आहे.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून ‘अबकी बार बंगालमध्ये 200 पार’चा देण्यात आलेला नारा पूर्णपणे अपयशी ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह जवळपास सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या राज्यात प्रचारसभा झाल्या, तरीही ममता बॅनर्जी एकटय़ाच पूर्ण भाजपकरता वरचढ ठरल्या आहेत. ‘4 एम’ ममतांच्या विजयाचे प्रमुख कारण असल्याचे राजकीय जाणकारांचे मानणे आहे.
‘4 एम’ म्हणजे काय?
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक प्रचार आणि मतदानादरम्यान मतुआ, मुस्लीम, महिला आणि ममता हे शब्द खूपच चर्चेत राहिले आहेत. या चारही शब्दांचा सुरुवात ‘एम’ने होते याचमुळे ‘4 एम’ची चर्चा होत आहे. यातील 3 एम निवडणुकीत विजय मिळवून देणार असल्याची भाजपला अपेक्षा होती. पण निकाल पाहता भाजपचा मोठा अपेक्षाभंग झाला आहे. ‘4 एम’चा थेट लाभ ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसला झाला आहे.
एम फॉर मतुआ
प्रचारादरम्यान 4 एम लाभ मिळवून देतील असा दावा भाजपकडून करण्यात येत होता. 2 कोटी लोकसंख्या असलेल्या मतुआ समुदायाची मते प्राप्त करण्यासाठी भाजपने आटोकाट प्रयत्न केले हेते. पण निकाल पाहिल्यास मतुआ समुदायातील बहुतांश मतदारांनी भाजपपेक्षा ममता बॅनर्जींवरच अधिक भरवसा दाखविल्याचे स्पष्ट होते.
एम फॉर मुस्लीम
ममता बॅनर्जी मुस्लिमांचे तुष्टीकरण करत असल्याचा आरोप भाजपने सातत्याने केला होता. ममतांनी जाहीर सभेत मुस्लिमांना एकजूट राहण्याचा संदेश दिला असता पंतप्रधान मोदींनी अप्रत्यक्ष स्वरुपात राज्यातील हिंदूंना भाजपला पाठिंबा देण्याचा संदेश दिला होता. मुस्लिमांची एकगठ्ठा मते तृणमूलला मिळाल्यास हिंदूंची मते आपल्या बाजूने वळतील ही भाजपची अपेक्षा फोल ठरली आहे. मुस्लीमबहुल मतदारसंघात एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही अनेक उमेदवार उभे केले, पण त्यांना बिहारसारखी कमाल करून दाखविता आली नाही. ममतांनी तेजस्वी यादव यांच्यासारखी चूक केली नाही आणि मुस्लीम मतदारांना स्वतःसोबत जोडून ठेवण्यास यश मिळविले.
एम फॉर महिला
राज्यात महिलांनी मतदानात मोठा भाग घेतला होता. मतदानासाठी महिलांचा उत्साह पाहून हा पाठिंबा आपल्याच उमेदवारांना मिळणार असल्याची भाजपची अपेक्षा चुकीची ठरली आहे. मागील वर्षी बिहार विधानसभा निवडणुकीत महिलांकडून झालेल्या लक्षणीय मतदानाचा लाभ भाजप आणि नितीश कुमार यांना झाला होता. पण बंगालमध्ये असे घडले नाही. पश्चिम बंगालमध्ये बहुतांश महिलांनी ममतांच्या नेतृत्वालाच पसंती दिली आहे.
एम फॉर ममता
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ‘जय श्रीराम’च्या नाऱयामुळे चिडत असल्याचे आढळून आले आहे. या कारणामुळे भाजप पूर्ण निवडणुकीत त्यांना हिंदूविरोधी ठरविण्याचा प्रयत्न करत होता. याच्या प्रत्युत्तरादाखल ममता बॅनर्जी यांनी सभेच्या व्यासपीठावर चंडी पठण केले होते. ममतांनी आपण ब्राह्मण आणि शांडिल्य गोत्राच्या असल्याचे सांगितले होते. पंतप्रधान मोदींनी जाहीर सभेत ‘दीदी ओ दीदी’ असे म्हणत टीका केली असता प्रत्युत्तरादाखल ममतांनी जोरदार शाब्दिक हल्ले चढविले. ममतांनी भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप पूर्ण प्रचार व्हिलचेअरवरूनच केला आहे. याचबरोबर ममतांनी पूर्ण प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना राज्याबाहेरील ठरवत राहिल्या. तर स्वतःला भूमिकन्या आणि बंगालची मुलगी संबोधित करत होत्या. म्हणजेच एम फॉर ममता बॅनर्जी हा घटकही भाजपला नुकसानकारक ठरला आहे.