ममतांनाही अपेक्षा : मुस्लीमबहुल जिल्हे
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या सातव्या आणि आठव्या टप्प्यात 71 मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. मुस्लीमबहुल मालदा, मुर्शिदाबाद, उत्तर दिनाजपूर आणि दक्षिण दिनाजपूर जिल्हय़ातील मतदारसंघांवरच काँग्रेसचे बंगालमधील राजकीय अस्तित्व टिकून आहे. याच मतदारसंघातील कामगिरीवर ममतांना सत्ता राखता येणार की नाही हे ठरणार आहे. तर भाजप त्रिकोणी लढाईत विजयाची आस बाळगून आहे.
मुस्लीमबहुल मालदा, मुर्शिदाबाद, उत्तर दिनाजपूर आणि दक्षिण दिनाजपूर जिल्हय़ात एकूण 49 मतदारसंघ आहेत. उत्तर दिनाजपूर जिल्हय़ातील 9 मतदारसंघांकरता मतदान पार पडले आहे. तर उर्वरित तीन जिल्हय़ांमध्ये सातव्या टप्प्यात मतदान होईल. 2016 च्या निवडणुकीत तृणमूलची या चारही जिल्हय़ांमधील कामगिरी अत्यंत खराब राहिली होती.
मागील निवडणुकीत मालदा, मुर्शिदाबाद, उत्तर आणि दक्षिण दिनाजपूरमधील 49 पैकी निम्म्यापेक्षा अधिक म्हणजेच 26 जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. तर 11 जागा डाव्या पक्षांना मिळाल्या होत्या. तृणमूलला केवळ 10 जागांवर समाधान मानावे लागले होते. ममता बॅनर्जी यांच्या लाटेतही तृणमूलला येथे चांगली कामगिरी करता आली नव्हती. भाजपच्या मोठय़ा राजकीय प्रभावामुळे तृणमूलला सत्ता राखण्यासाठी याच भागावर लक्ष केंद्रीत करावे लागत आहे.
बंगालची राजकीय लढाई तृणमूल आणि भाजप यांच्या भोवती फिरत असल्याने काँग्रेस-डाव्या पक्षांसमोर राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. काँग्रेसने मागील वेळी याच भागातील जागा जिंकून मुख्य विरोधी पक्ष होण्याचा मान मिळविला होता.
भाजपलाही अपेक्षा
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला येथील 49 विधानसभा मतदारसंघांपैकी पैकी 10 ठिकाणी आघाडी मिळाली होती. याचमुळे भाजपमध्ये उत्साह दिसून येत आहे. भाजपने या भागातील अनेक मतदारसंघांमध्ये मुस्लीम उमेदवार उभे केले आहेत. मालदा आणि मुर्शिदाबाद येथे मोदींची सभा होणार होती. पण कोरोनामुळे या सभा रद्द झाल्या आहेत.