बहुतांश गुजरातमधील रहिवासी – अटारी सीमेवरून भारतात दाखल
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
चार वर्षांपासून कराचीच्या तुरुंगात असलेल्या 20 भारतीय मच्छिमारांची पाकिस्तानमधून सुटका करण्यात आली आहे. सोमवारी सर्व मच्छिमार अटारी सीमेवरून भारतीय हद्दीत दाखल झाले. सुटका करण्यात आलेले बहुतांश मच्छिमार गुजरातमधील आहेत. मासेमारी करत असताना चुकून पाकिस्तानच्या सागरी हद्दीत गेल्यामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली होती. भारतातील हे मच्छिमार 4 वर्षांची शिक्षा भोगून देशात परतले. या मच्छिमारांना पाकिस्तान सागरी सुरक्षा दलाने 4 वर्षांपूर्वी पकडले होते. त्यांच्यावर पाकिस्तानी समुद्रात मासेमारी केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
सध्या 588 भारतीय पाकिस्तानच्या तुरुंगात असून त्यामध्ये बहुतांश मच्छिमार आहेत. ते कराचीतील लांधी तुरुंगात बंद आहेत. दरवषी भारत आणि पाकिस्तान आपल्या तुरुंगातील कैद्यांची सुटका करून शांततेचा संदेश दिला जातो. ही प्रक्रिया वर्षातून दोनदा होते. या वर्षाच्या सुरुवातीलाही पाकिस्तानने 20 मच्छिमारांची सुटका केली होती. यापूर्वी एप्रिल 2019 मध्ये 100 भारतीय मच्छिमारांची सुटका करण्यात आली होती. 2020 मध्ये कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय सीमा बंद केल्यामुळे दोन्ही देशांनी एकाही कैद्याची सुटका केली नव्हती.