संसदेत आकडेवारी सादर ः उज्ज्वला योजनेचे लाभार्थी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशातील गरीब कुटुंबातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या उज्ज्वला योजनेसंबंधी संसदेत आकडेवारीत सादर करण्यात आली आहे. पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल उज्ज्वला योजनेच्या 4.13 कोटी लाभार्थींनी घरगुती वापराचा सिलिंडर एकदाही रिफिल करविला नसल्याचे सांगितले आहे. तर याच योजनेंतर्गत 7.67 कोटी लाभार्थींनी केवळ एकदाच सिलिंडर रिफिल करविला आहे.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारकडून उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींशी निगडित माहिती मागितली होती. 2017-18 दरम्यान उज्ज्वला योजनेच्या 46 लाख लाभार्थींनी एकही सिलिंडर रिफिल करविलेला नाही. तर 1.19 कोटी लाभार्थींनी केवळ एकदाच सिलिंडर रिफिल करविला आहे. 2018-19 दरम्यान 1.24 कोटी, 2019-20 दरम्यान 1.14 कोटी, 2020-21 दरम्यान 10 लाख आणि 2021-22 दरम्यान 92 लाख लाभार्थींनी एकदाही सिलिंडर रिफिल करविलेला नसल्याचे रामेश्वर तेली यांनी सांगितले.
2018-19 दरम्यान 2.90 कोटी, 2019-20 दरम्यान 1.83 कोटी, 2020-21 दरम्यान 67 लाख आणि 2021-22 दरम्यान 1.08 कोटी लाभार्थींनी केवळ एकदाच सिलिंडर रिफिल करविला आहे. 2021-22 दरम्यान एकूण 30.53 कोटी घरगुती गॅस सिलिंडर ग्राहकांपैकी 2.11 कोटी ग्राहकांनी एकही सिलिंडर रिफिल करविलेला नसल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्र्यांनी दिली आहे.
केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत देशभरात 9 कोटी मोफत घरगुती गॅस कनेक्शन्स प्रदान केल्या आहेत. या योजनेच्या लाभार्थीला प्रत्येक एलपीजी सिलिंडरकरता अनुदानाच्या स्वरुपात केवळ 200 रुपये प्राप्त होत आहेत.