प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी जिल्हय़ात सर्वत्र संचारबंदी आहे. मात्र किरकोळ कारणासाठी वाहने घेवून रस्त्यावर येणाऱयांची संख्या अनेकदा आवाहन करूनही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे वाहतूक पोलीसांनी आक्रमक भुमिका घेत अनावश्यक फिरणाऱया वाहनचालकांचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी 40 वाहनांवर अशी कारवाई करण्यात आली असून त्यांचे परवाने निलंबित करण्यासाठी आरटीओंकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी दिली.
संचारबंदी असतानाही नागरिक अगदी किरकोळ कारणासाठीही घराबाहेर पडतानाचे दृष्य सर्वत्र दिसून येत आहे. कोरोनाविरोधातील लढाई अद्यापही संपली नाही, यावर मात करायचे असेल तर नागरिकांचे सहकार्य अत्यावश्यक आहे. मात्र नागरिक छोटी छोटी कामे घेवून अत्यावश्यक पास नसताना घराबाहेर पडत आहेत त्यामुळे अखेर कडक कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा वाहतूक पोलीसांना घ्यावा लागला आहे.
सोमवारी अनावश्यकपणे वाहन घेऊन घराबाहेर पडलेल्या 40 लोकांवर दंडात्मक कारवाई करतानाच त्यांचे परवाना जप्त करण्यात आले आहे. परवाना निलंबित करण्यासाठी आरटीओकडे वाहतूक पोलीसांनी प्रस्ताव सादर केला असून यावर लवकरच कार्यवाही होईल असे अनिल विभुते यांनी सांगितले. 14 एप्रिलपर्यंत कोणीही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन विभुते यांनी केले आहे.