वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पाकव्याप्त काश्मीरच्या सीमेलगतच्या भागात पाकिस्तान प्रशिक्षित 300 ते 400 दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती भारताचे भूसेना प्रमुख नरवणे यांनी दिली आहे. येथील सैनिक संचलनाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी भारत कोणत्याही स्थितीला तोंड देण्यास समर्थ व सज्ज असल्याचे प्रतिपादन केले. भारतीय सैन्याने अत्यंत जागरूक राहून पाकिस्ताची सर्व कारस्थाने धुळीस मिळविली असल्याचे आणि सीमा सुरक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय सेनादले सध्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेतून जात आहेत. भारतीय सैन्यदलांची नव्या काळातील आव्हानांना अनुकूल अशा प्रकारे पुनर्रचना होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सैन्यासाठी लागणारी शस्त्रे आणि तंत्रज्ञान भारतातच बनविले जावे, याचा प्रयत्न सैन्य व्यवस्थापन करीत असून त्याकरिता आयआयटी व इतर भारतीय तांत्रिक संशोधन संस्थांशी संपर्क करण्यात आला आहे. ‘मेक इन इंडिया’ योजनेच्या अंतर्गत आधुनिकीकरणाच्या 29 प्रकल्पांवर काम सुरू असून त्यासाठी 32 हजार कोटी रूपयांचा खर्च केला जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
पंजाबमध्ये पाक घुसखोर ठार
पंजाबच्या सीमेवर शुक्रवारी सीमा सुरक्षा दलाने एका पाकिस्तानी घुसखोराला यमसदनी धाडले आहे. हा घुसखोर अमृतसर सीमारेषा ओलांडून भारतात येण्याचा प्रयत्न करीत होता. ही घटना गुरूवारी घडली. सीमेवरच त्याला हटकण्यात आल. तेव्हा त्याने मागे पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला टिपण्यात आले.