राजस्थानच्या युवकाचे कराडकरांकडून स्वागत, अभियानाला दिले प्रोत्साहन
प्रतिनिधी/ कराड
देशात मुलींची घटती संख्या आणि त्यांच्या शिक्षणाकडे होणारे दुर्लक्ष हा चिंतेचा विषय आहे. यावर शासन योजना राबवत असतानाच राजस्थानच्या ठिकरिया भागातील 23 वर्षीय युवक ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा संदेश देत देशातील 9 राज्यातून प्रवास करत आहे. नुकतेच त्याचे कराड, मलकापूर परिसरात स्वागत करण्यात आले.
विक्रम बाजिया या युवकाने राबवलेला हा उपक्रम समाजाला प्रेरित करणारा असून त्याच्या संवादातून मुलींच्या जन्माचे आणि शिक्षणाचे महत्त्व याबाबत जनजागृती होत आहे. कराडच्या कोल्हापूर नाक्यावर नुकतेच तो पायी चालत पोहोचला. याप्रसंगी फटाक्यांच्या आतषबाजीत हार, बुके देऊन त्याचे स्वागत झाले. मलकापूरचे बांधकाम सभापती राजेंद्र यादव, शेती उत्पन्न बाजार समितीचे जगन्नाथ लावंड, वारूंजी ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव पाटील, अशोक कल्लेवाड, प्रणव पाटील, रमेशलाल यादव, रमेश परिहार, बनवारीलाल यादव, बुधराम शर्मा, सुभाष प्रजापत यांची प्रमुख उपस्थिती होती.
विक्रम बाजिया हा अवघ्या 23 वर्षांचा तरूण आहे. देशात सध्या मुलींचा जन्मदर आणि त्यांचे शिक्षण याकडे दुर्लक्ष होत असल्याची जाणिव त्याला झाली. या जाणिवेतून आपण स्वतः काही तरी केले पाहिजे, या हेतूने त्याने मे 2022 पासून श्रीनगर येथून पायी प्रवासाला सुरूवात केली. ज्या गावात जाईल तेथील लोकांना फक्त मुलींच्या जन्माचे आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून देत पुढे चालायचे हा त्याचा दिनक्रम चार महिन्यांनी कराडात पोहोचला आहे. कराड, मलकापूर परिसरातही विक्रमने नागरिकांशी संवाद साधत जनजागृती केली.
राजेंद्र यादव म्हणाले, विक्रम बाजियाचा चार हजार किलोमीटरचा पायी प्रवास चकीत करणारा आहे. त्याने हातात घेतलेला उपक्रम हा प्रत्येक कुटुंबाला विचार करायला लावणारा असून प्रत्येक घरात मुलींचा सन्मान झाला पाहिजे, हा उद्देश देत तो जनजागृती करत आहे. यावेळी सुभाष प्रजापत, महेश सैनी, बिरबल चौधरी यांच्यासह कराड, मलकापूरस्थित राजस्थानी कुटुंबे उपस्थित होती.