प्रतिनिधी /म्हापसा
दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे गिरी पंचायतीमध्ये पाणी भरून काही कागदपत्रेही पाण्यात भिजून महत्त्वाच्या फाईल्स खराब झाल्या. अनेक गाडय़ा पाण्यात मधोमध बंद पडून नादुरुस्त झाल्या. सांगोल्डा येथील नीळकंठ नाईक यांच्या बागेत पाणी भरल्याने त्यांची झाडे कुजल्याने त्यांना सुमारे 40 हजारांचे नुकसान झाले.
पारोसवाडा सांगोल्डा मरड येथे आपल्या आईवडिलांच्या कारकीर्दिपासून 80 वर्षांपासून शेती करीत आहे. परंतु सांगोल्डा सीम ते गौतमवाडा दरम्यान सर्वत्र पावसाचे पाणी भरते. मोठा पाऊस आला की सर्व शेताची नाशाडी होते. प्रत्येक वर्षी दोन वेळा आम्हाला पेरणी करावी लागते, यंदाही येथे शेतात पाणी भरल्याने आपल्या शेतात लागवड केलेली सुपारीची झाडे, केळीची झाडे पाणी भरल्याने कुजून गेल्याचे सांगोल्डा येथील नीळकंठ नाईक म्हणाले.
यंदा आम्ही दीडशे माड, 300 सुपारीची झाडे, 40 पालपणस, निरफणस 80, पेरू, हातेर आदी झाडे लावली आहेत. मात्र पाणी भरल्याने ती कुजून गेली आहे. याची सरकारने दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी व पुन्हा झाडांची लागवड करण्यात सहकार्य करावे, अशी मागणी त्यांनी केली.