डॉ. शेखर साळकर यांचे आवाहन , लस घेतल्याने कोरोनावर मात करणे शक्य
प्रतिनिधी/ पणजी
कोविडची साथ ग्रामीण भागात वेगाने पसरत असून 45 वर्षांवरील वयाच्या प्रत्येक व्यक्तीने लस घेणे अत्यावश्यक आहे. लस घेतल्याने कोरोनामुळे मृत्यू येत नाही. हे 100 टक्के सत्य असल्याचे भाजपचे मेडिकल सेलचे निमंत्रक डॉ. शेखर साळकर यांनी पत्रकार परिषतेत बोलताना सांगितले.
पंचायत पातळीवर लसीकरण सुरू केल्याने त्यांनी सरकारचे आभार मानले व लसीकरण घरोघरी पोहोचले पाहिजे, असे ते म्हणाले. लसीकरणची भीती जनतेत नाही, मात्र आरोग्य केंद्रावर येऊन ताटकळत रहावे लागणार व परतताना त्रास झालातर काय, अशी नाहक भीती ग्रामीण भागात पसरल्याने लसीकरणाला अल्प प्रतिसाद आहे. जे कामानिमित्त गावाबाहेर जातात. तेच लसीकरणासाठी जातात, असे ते म्हणाले.
डिचोली मतदारसंघ लक्ष्य
शनिवारी एका दिवसांत 219 जणांना कोविडची लस देण्यात आली. लाडफे गावात 129 तर नानोडा येथे 90 जणांनी लस टोचून घेतली. आता रोज मोहीम गावागावात चालवून आठ दिवसांच्या आत डिचोली मतदारसंघ पूर्ण करणार, अशी माहिती त्यांनी दिली.
आमदार विजय सरदेसाई यांचे अभिनंदन
लसीकरण मोहिमेला पाठिंबा देण्यास आमदार विजय सरदेसाई यांनी ज्याप्रमाणे पुढाकार घेतला आहे. त्या पद्धतीने प्रत्येकाने सीमा न ठेवता या मोहिमेला यशस्वी बनवा, अशी हाक देताना डॉ. साळकर यांनी आमदार विजय सरदेसाई यांचे अभिनंदन केले. लायन्स क्लब आदींनी गाव दत्तक घेऊन मोहीम राबवण्याचे आवाहन त्यांनी केले.
ताप आलाच पाहिजे असे नाही!
लस घेतल्यावर हलका ताप येतो, पण तो आलाच पाहिजे, असे नाही. तरुण वयाच्या व्यक्तीने लस घेतल्यास त्याला ताप येण्याचे प्रमाण अधिक आहे. वृद्ध व्यक्तींना सहसा ताप आलेला नाही व लक्षणेही जाणली नाहीत,अशी माहिती त्यांनी दिली.
लस प्रत्येकाला सक्तीची
कोराना लस प्रत्येकाला सक्तीची असून यापूर्वी कोरोना झालेल्या व्यक्तीने तीन महिन्यानंतर लस घ्यावी, असे त्यांनी सांगितले. कुठलाही औषधोपचार चालू असलातरी लस घेता येते. फक्त ऍलर्जी दुखणे असल्यास तशी कल्पना डॉक्टरना देणे आवश्यक आहे. लस घेतलेल्या कुठल्याही व्यक्तीला 48 तास रक्तदान करता येत नाही, असे डॉ. साळकर म्हणाले.
यावेळी डॉ. विनोद वेरेकर, आणि डॉ. शैलेश कामत उपस्थित होते.
25 लाख लस वाया ः डॉ.साळकर
लसची एक बाटली उघडल्यावर चार जणांचे लसीकरण करता येते. पण जनतेचा अल्प प्रतिसाद असल्याने आतापर्यंत 25 लाख लस वाया गेली. संपूर्ण गोव्याची लोकसंख्या आतापर्यंत कोरोनामुक्त झाली असती, असे डॉ. शेखर साळकर यांनी सांगितले. जोपर्यंत लस घेतली जात नाही तोपर्यंत सरकारी सुविधा, निराधार योजना, गृह आधार योजना आदींचा लाभ मिळणार नाही, असे केल्याशिवाय लसीकरणाला गती मिळणार नाही, असही ते म्हणाले.