सेन्सेक्स 139 अंकांनी तेजीतः निफ्टी 13,513.85 वर स्थिरावला
वृत्तसंस्था/ मुंबई
मागील पाच दिवसांची सलगची तेजी गुरुवारच्या सत्रात खंडित झाली होते. परंतु पुन्हा विदेशी गुंतवणूकदारांकडून मिळणाऱया गुंतवणुकीतून भारतीय शेअर बाजार पुन्हा एकदा सप्ताहाच्या अंतिम दिवशी सावरल्याचे पहावयास मिळाले आहे. दिवसभरातील कामगिरीनंतर सेन्सेक्स 139 अंकांच्या मजबूतीने बंद झाला असून सेन्सेक्सने काही वेळ 46,309.63 अंकांवर पोहचून नवीन विक्रम नेंदवला आहे.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीतून दिवसअखेर सेन्सेक्स 139.13 अंकांनी वधारुन निर्देशांक 46,099.01 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 35.55 अंकांच्या तेजीसह 13,513.85 वर स्थिरावल्याची नोंद करण्यात आली आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये ओएनजीसीचे समभाग सर्वाधिक सहा टक्क्यांनी मजबुतीत राहिले आहेत. सोबत एनटीपीसी, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, टायटन आणि बजाज ऑटोचे समभाग वधारले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये मात्र ऍक्सिस बँक, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, टेक महिंद्रा, एशियन पेन्ट्स आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत.
अन्य घडामोडींचा प्रभाव
जागतिक पातळीवर होत असणाऱया सामाजिक, राजकीय, आर्थिक घडामोडींचा प्रभाव भारतीय भांडवली बाजारावर होत असल्याचे संकेत आहेत. यामध्ये विविध क्षेत्राने कोरोनानंतर घेतलेला तेजीचा सूर, आर्थिक वृद्धीसंदर्भात प्राप्त होणारे वेगवेगळय़ा संस्थांचे अंदाज आदीचा सकारात्मक प्रभाव शेअर बाजारावर होत असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. याचा एक भाग म्हणून बीएसई सेन्सेक्स दररोज नवीन टप्पा प्राप्त करत असून सध्या 46,000 चा टप्पा गाठून नवा विक्रम करतो आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरोना लसीच्या नव्या येणाऱया बातम्या आणि त्यामुळे उद्योगासह आर्थिक क्षेत्रात निर्माण होणारा उत्साह याचा लाभ आगामी काळात भांडवली बाजारासह अन्य बाजारांना होणार आहे.