पाच महिला आयपीएल संघांचा लिलाव, अपेक्षेपेक्षाही अधिक यश
मुंबई / वृत्तसंस्था
महिला आयपीएल स्पर्धेत भाग घेणाऱया 5 महिला संघांच्या लिलावातून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घसघशीत 4,669.99 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ही प्राप्ती आधीच्या अनुमानापेक्षाही जास्त आहे. हा लिलाव पाच वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आला. त्यासंबंधी मंडळाने समाधान व्यक्त केले आहे.
2008 मध्ये पुरुष आयपीएल स्पर्धेसाठी जो लिलाव करण्यात आला होता, त्यातून मिळालेल्या रकमेपेक्षा ही रक्कम जास्त असल्याची माहिती देण्यात आली. मंडळाने लिलाव विजेत्या उद्योग समूहांची नावेही प्रसिद्ध केली आहेत. अदानी समूह, काप्री ग्लोबल, तसेच मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर या पुरुष संघांच्या मालकांनी महिला संघांसाठीचे लिलाव जिंकले आहेत.
येत्या मार्चपासून महिलांच्या या आयपीएल स्पर्धेचा प्रारंभ होत आहे. ही महिलांसाठीची भारतातील पहिलीच स्पर्धा असेल. मुंबई, दिल्ली, बेंगलोर, अहमदाबाद आणि लखनौ या पाच शहरांच्या नावांनी हे संघ ओळखले जाणार आहेत. चेन्नई आणि कोलकाता या शहरांचे महिला संघ मात्र या स्पर्धेसाठी नाहीत.
बुधवारी लिलाव
या पाच संघांसाठीचा लिलाव बुधवारी सकाळी मुंबईत घेण्यात आला. सीलबंद पाकिटातून स्पर्धकांनी त्यांची बोली लावली होती. मंडळाचे सचिव जय शहा यांनी नंतर या प्रक्रियेची माहिती दिली. भारताच्या क्रिकेटसाठी बुधवारचा दिवस ऐतिहासिक सिद्ध झाला आहे. आजच्या महिला संघांनी 2008 च्या पुरूष संघांचा आर्थिक विक्रम मोडला आहे. मंडळ सर्व लिलाव विजेत्यांचे अभिनंदन करीत आहे. बुधवार हा महिला क्रिकेटसाठी क्रांतीकारक दिवस म्हणून गणला जाईल. क्रिकेट क्षेत्राच्या परिवर्तनाचा हा क्षण केवळ क्रिकेटच नव्हे, तर साऱया क्रीडा विश्वासाठी अभिमानाचा दिवस आहे, अशा शब्दांमध्ये जय शहा यांनी भावना व्यक्त केल्या.