कोरोना नियंत्रणासाठी केंद्र सरकारकडून तयारी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतातील कोरोना उदेकाची परिस्थिती नियंत्रणात आहे. रूग्णसंख्या वाढत असली तरी या वाढत्या संख्येशी जुळवून घेण्यासाठी पुरेशा पायाभूत सुविधांची तयारी करण्यात आली आहे. देशातील 483 जिल्हय़ांमध्ये 7 हजार 740 उपचार केंद्रे स्थापन करण्यात आली असून त्यांची तीन प्रकारांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे रूग्णांना सर्व प्रकारचे साहाय्य देण्याची सज्जता आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने पत्रकार परिषदेत दिली आहे.
विशेष कोरोना रूग्णालये, विशेष कोरोना आरोग्य आस्थापने आणि विशेष कोरोना उपचार केंद्रे अशा तीन प्रकारांमध्ये या 7 हजार 740 उपचार केंद्रांची विभागणी करण्यात आली आहे. ज्या भागांमध्ये कोरोनाचे रूग्ण अधिक प्रमाणात आहेत तेथे अशा केंद्रांची संख्याही अधिक ठेवण्यात आली आहे. या उपचार केंद्रांमध्ये 6 लाख 56 हजार 769 विलगीकरण शय्या (बेड्स्), कोरोनाबाधित रूग्णांसाठी 3 लाख 5 हजार 567 रूग्णशय्या, संशयित कोरोना रूग्णांसाठी 3 लाख 51 हजार 204 शय्या, 34 हजार 76 अतिदक्षता कक्ष शय्या आणि 1 हजार 696 प्राणवायू सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
माहिती वेबसाईट्स्वर उपलब्ध
या सुविधांच्या उपलब्धतेची माहिती त्यांच्या वेबसाईटवर टाकण्याची, तसेच या वेबसाईट्स नेहमी अद्यायावत ठेवण्याची सूचना राज्य सरकारांना करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांना या सुविधांची आवश्यकता आहे, त्यांना त्यांच्या उपलब्धतेची माहिती त्वरित मिळू शकेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
चाचणी क्षमतेत मोठी वाढ
चाचण्या घेणे आणि त्यांचे अहवाल देणे या प्रक्रिया गतीमान करण्यात आल्या आहेत. चाचण्यांच्या क्षमतेत अनेक पटींनी वाढ करण्यात आली आहे. यासाठी उच्च क्षमतेची यंत्रणा स्थापन करण्यात आली असून एका दिवसात 1200 नमुने तपासण्याची या यंत्रांची क्षमता आहे. हे कोबास 6800 श्रेणीचे यंत्र आहे. अशी अनेक यंत्रे क्रियान्वित करण्यात आली आहेत.
रूग्णसंख्या 62 हजार पार
देशातील कोरोनाबाधितांची एकंदर संख्या आता 62 हजार 939 झाली आहे. शनिवार संध्याकाळ ते रविवार संध्याकाळ या चोवीस तासांमध्ये 3 हजार 277 रूग्णांची भर पडली आहे. याच चोवीस तासांमध्ये 128 रूग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूंची संख्या 2 हजार 109 झाली आहे. तसेच याच चोवीस तासांमध्ये 1,511 रूग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रूग्णांची एकंदर संख्या आता 19 हजार 357 आहे. हे प्रमाण एकंदर रूग्णसंख्येच्या साधारणतः 30 टक्के आहे. तर मृत्यूंचे प्रमाण एकंदर रूग्ण्संख्येच्या 3.2 टक्के इतके आहे.
महाराष्ट्राची स्थिती चिंताजनकच
प्रतिदिन आढळणाऱया नव्या रूग्णांपैकी सरासरी 38 टक्के रूग्ण महाराष्ट्रात आढळत आहेत. ही बाब काही प्रमाणात चिंताजनक आहे. मृत्यूंची संख्याही महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. त्याखालोखाल गुजरातमधील स्थिती काळजी करण्यासारखी असून महाराष्ट्रात 22 हजारहून अधिक तर गुजरातमध्ये 7 हजारांहून अधिक आहेत. मध्यप्रदेशातील परिस्थिती गेल्या आठवडाभरात नियंत्रणात असून तेथे रूग्णसंख्या वाढीचा वेग मंदावला आहे.
स्थिती नियंत्रणात
ड रूग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता 11 दिवस
ड बरे होण्याच्या प्रमाणातही होत आहे काहीशी सुधारणा
ड पश्चिम बंगालमध्ये मृतांच्या संख्येत 3 दिवसांमध्ये वाढ
ड केंद्र सरकारचा राज्यांशी सातत्यपूर्ण संपर्क, विचारविमर्श