6 महिन्यांमध्ये नेत्यांच्या मुक्ततेची 6 वी घोषणा
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीर प्रशासनाने नजरकैदेत असलेल्या विविध पक्षांच्या नेत्यांपैकी 5 जणांची शनिवारी मुक्तता केली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते नाजिर गुरेजी, पीडीपीचे अब्दुल हक खान, पीपल्स कॉन्फरन्सचे अब्बास वाणी आणि काँग्रेसचे अब्दुल राशी यांचा यात समावेश आहे. तत्पूर्वी 26 नोव्हेंबर, 30 डिसेंबर, 10 जानेवारी, 16 जानेवारी आणि 17 जानेवारी रोजीही नेत्यांची मुक्तता करण्यात आली होती. नजरकैदेत असलेल्या नेत्यांना श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर समवेत बारामुल्ला-गुरेजमध्ये निर्माण करण्यात आलेल्या तात्पुरत्या केंद्रांमध्ये ठेवण्यात आले आहे.
केंद्र सरकारने 5 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार करण्याचे पाऊल उचलले होते. या निर्णयानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला होता. कलम 370 हद्दपार करण्यात आल्यावर खोऱयातील विविध पक्षांच्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आले होते. पण अद्याप नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला, त्यांचे पुत्र ओमर आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यासारख्या प्रमुख नेत्यांना स्थानबद्ध ठेवण्यात आले आहे.
गुन्हे घेतले मागे
26 नेत्यांच्या विरोधात नोंदविण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. काश्मीर बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष नारिज अहमद रोंगा यांचीही मुक्तता करण्यात आली आहे. 16 रोजी नॅशनल कॉन्फरन्सचे सलमान सागर, शौकत गनी, अल्ताफ कालू, पीडीपीचे निजामुद्दीन भट्ट आणि मुख्तियार बाबा यांची मुक्तता करण्यात आली होती.