अंबानींचे प्रतिपादन : इंडियन मोबाईल काँग्रेस कार्यक्रमास प्रारंभ
नवी दिल्ली : भारतात मोबाइल आणि डिजिटल क्षेत्रात दिलासादायक बदल झाले असून येणाऱया काळात 5 जी सेवा व्यापक स्तरावर बहाल करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार असल्याचे मत रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन व रिलायन्स जिओचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी इंडियन मोबाईल काँग्रेसच्या कार्यक्रमात व्यक्त केले आहे.
इंडियन मोबाईल काँग्रेसचा कार्यक्रम 10 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. कार्यक्रमात बोलताना प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी म्हणाले की, एका बाजुला भारताने कोवीड-19 लसीकरणाच्या मोहिमेत अभूतपूर्व कामगिरी निभावली असून दुसरीकडे ही बाब अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी फलदायी ठरत आहे. याबाबतीत आपल्या उद्योगाचे योगदानही मोलाचे राहिले आहे. भारत आता यापुढे कोरोनाच नव्हे तर इतर कोणत्याही लाटेला नियंत्रीत करण्यात यशस्वी होईल, याबाबत आत्मविश्वास आहे, असेही त्यांनी सांगितले.
आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाल्या असून आम्ही 100 टक्के देशी आणि व्यापक स्वरूपाची 5 जी सेवा विकसित केली असल्याचे अंबानी यांनी सांगत, आधुनिक तंत्रज्ञानामुळे 4 जी सेवेचे 5 जीत जलदरितीने रुपांतर करता येणार असल्याचे ते म्हणाले. डिजिटलीकरणाच्या या युगात जास्तीत जास्त लोकांना सामावून घेताना त्यांना माफक किंमतीत सेवा व उपकरणे उपलब्ध करण्याची आवश्यकता असणार आहे. सरकारी युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लीगेशन फंडचा वापर मोबाइल सबसिडी देण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.
भारतात 2 जी व 4 जी सेवा वापरल्या जातात. त्यांचे रुपांतर 5 जी सेवेत लवकरात करता आले तर उत्तम होणार आहे. लाखो भारतीय जे सामाजिक-आर्थिक स्तरावर गरिबीत आहेत अशांना डिजिटल क्रांतीपासून दूर ठेवून चालणार नाही. कोरोना काळात जेव्हा सगळं काही बंद होतं तेव्हा इंटरनेट व मोबाइलनेच आपल्याला सहारा दिला आहे.