देशात बाधितांचा आकडा 14 लाखाच्या पुढे : 9 लाखाहून जास्त रूग्ण झाले बरे
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोना संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने 14 लाखांच्या पुढे गेली आहे. सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार अखेरच्या चोवीस तासात तब्बल 49 हजार 931 नवे रुग्ण मिळाले आहेत. कोरोना चाचणी तपासण्यांचा वेगही वाढविण्यात आला असून 26 जुलैला एका दिवसात तब्बल 5 लाख 15 हजार 472 स्वॅब तपासणी करण्यात आल्याची माहिती, ‘आयसीएमआर’कडून देण्यात आली. तसेच आतापर्यंत तब्बल 1 कोटी 68 लाख 6 हजार 803 जणांची कोरोना तपासणी करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार कोरोना विषाणूमुळे देशात आतापर्यंत 14 लाख 35 हजार 453 लोक संक्रमित झाले आहेत. देशात अजूनही कोरोनाचे 4 लाख 85 हजार 114 सक्रिय रुग्ण आहेत. तर 9 लाख 17 हजार 568 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत देशात 32 हजार 771 लोकांचा मृत्यू झाला आहे. सोमवारपर्यंत मागील चोवीस तासात 708 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. देशाचा रिकव्हरी दर सध्या 63.92 वर पोहोचला आहे.
कर्नाटकसह चार राज्ये हॉटस्पॉटच्या मार्गावर
कोरोनाचा कहर देशात चांगलाच वाढताना दिसत आहे. सध्या भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 14 लाखाच्या वर गेला आहे. गेल्या 4 दिवसांपासून प्रतिदिन 45 हजारांपेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. बिहार, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण जास्त आहे. आता ही राज्ये देशातील हॉटस्पॉट होण्याची शक्मयता आहे. या चार राज्यांत काही दिवसात कोरोनाचे मोठय़ा प्रमाणात रुग्ण सापडू शकतात.
देशात सध्या 19.3 दिवसात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. यात कर्नाटक राज्य आघाडीवर असून येथे 5.5 दिवसातच रुग्ण दुप्पट होत आहेत. त्यानंतर आंध्रप्रदेशचा दुपटीचा दर पहिला 13.2 होता जो आता 6.2 दिवसावर आला आहे. पश्चिम बंगाल आणि बिहारचा रुग्ण दुप्पट होण्याचा दर अनुक्रमे 8.5 आणि 14.9 दिवस आहे. एक महिन्यापूर्वी बिहारचा दुपटीचा दर हा 28 दिवस होता.
चोवीस तासात 708 जणांचा मृत्यू झाला असून त्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक 267 जणांचा समावेश आहे. तसेच तामिळनाडूतील 85, कर्नाटकातील 82, आंध्रपदेशात 56, पश्चिम बंगालमधील 40, उत्तर प्रदेशमधील 39, गुजरातमधील 26, दिल्लीतील 21, पंजाबमधील 15 जणांसह बिहार, ओडिशामधील प्रत्येक 10 जणांचा मृतांमध्ये समावेश आहे.