अनुराग जैन यांची माहिती : 60 हजारहून जास्त कंपन्यांना परवानगी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारतातल्या नोंदणीकृत स्टार्टअप कंपन्यांकडून गेल्या 5 वर्षाच्या कालावधीत 6.5 लाख लोकांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे. या संबंधीची माहिती उद्योsग आणि अंतर्गत व्यापार विभागाचे (डीपीआयआयटी) सचिव अनुराग जैन यांनी नुकतीच दिली आहे. म्हणजेच स्टार्टअप्स कंपन्यांनी भारतातील अनेकांना रोजगार मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे.
सरकारने 2016 मध्ये भारताला स्टार्टअप उद्योगात जगात तिसऱया नंबरवर आणण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, त्यादृष्टीने पाहता भारताची वाटचाल ही कौतुकास्पद ठरते आहे. 2016 नंतर स्टार्टअप योजनेला प्रोत्साहन देत डीपीआयआयटी विभागाने 60 हजारहून अधिक कंपन्यांना स्टार्टअप्ससाठी मान्यता दिली आहे. याबाबतीत पाहता प्रत्येक स्टार्टअपने 11 जणांना रोजगार दिला आहे. स्टार्ट अप क्रांतीमुळे आता या कंपन्यांमध्ये रोजगाराच्या नव्याने संधी उपलब्ध होत आहेत.
तीन वर्षे मिळते सवलत
स्टार्टअप श्रेणीत एखादी कंपनी आल्यावर सलग तीन वर्षे प्राप्तीकर व भांडवल लाभ कर यात सवलत दिली जाते. नोंदणी झाल्यानंतर सदरच्या कंपन्यांना अल्टरनेटीव्ह इन्व्हेस्टमेंट फंडमधून स्टार्टअपमध्ये गुंतवणुकीसाठी निधीदेखील पुरवला जातो.
2025 पर्यंत 20 लाख जणांना रोजगार
सरकारने स्टार्टअपसाठी कंपन्यांना प्रोत्साहन देत त्यांना या प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सरकारी स्तरावर राबवल्या आहेत. पुढील 4 वर्षांच्या कालावधीत 50 हजार नव्या कंपन्यांना स्टार्टअपमध्ये सामील केले जाणार आहे. यायोगे एकंदर पाहता 2025 पर्यंत आणखी 20 लाख जणांना रोजगार मिळवून दिला जाणार असल्याचे डीपीआयआयटी विभागाने म्हटले आहे.