तेलंगणाची राजधानी हैद्राबाद येथे पोलिसांनी धाड टाकून 5 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. निवडणूक काळात मतदारांना लाच म्हणून वाटण्यासाठी ही रक्कम आणण्यात आली होती, असा आरोप आहे. ही कोणत्या पक्षाची रक्कम आहे, याचे स्पष्टीकरण मात्र अद्याप झालेले नाही. या बेकायदा रकमेची वाहतूक करणाऱ्या सात जणांना अटक करण्यात आली आहे. हैद्राबादच्या गाचीबोवली भागात ही धाड टाकण्यात आली होती. ही सर्व रक्कम आता प्राप्तीकर विभागाच्या आधीन करण्यात आली असून तिची चौकशी केली जात आहे. यासंदर्भात भारत राष्ट समिती आणि काँग्रेस यांनी एकमेकांवर आरोप केले असून रकमेची जबाबदारी घेण्याचे दोन्ही पक्षांनी टाळले आहे. हैद्राबादमध्येच हयातनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात एका कारमधून 2 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. आदर्श आचार संहितेच्या नियमानुसार निवडणूक काळात बेहिशेबी रकमेची वाहतूक करणे हा गुन्हा आहे. तेलंगणात केंद्रीय निवडणूक आयोगाने नियमांचे काटेकोर पालन चालविले आहे.