ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या सर्व यात्रेकरूंना प्रत्येकी 5 लाखांचं विमा कवच देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. (Amarnath yatra 5 lakh insurance for each pilgrimage)
यंदाची अमरनाथ यात्रा 30 जूनपासून सुरू होणार आहे. 43 दिवस ही यात्रा चालणार आहे. या यात्रेबाबत घडामोडींचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तीन उच्चस्तरीय बैठका घेतल्या. त्यापैकी दोन बैठका या यात्रेची सुरक्षा आणि त्यासंदर्भातल्या व्यवस्थेबाबत होत्या तर तिसरी बैठक ही जम्मू-काश्मीरमधील सर्वसाधारण सुरक्षा व्यवस्थेबाबत होती. या बैठकीत अमरनाथ यात्रेकरूंना प्रत्येकी 5 लाखांचे विमा कवच आणि प्रत्येक यात्रेकरूला रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टीफिकेशन टॅग देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनामुळे दोन वर्ष अमरनाथ यात्रा झाली नव्हती. यंदा या यात्रेला परवानगी मिळाल्यामुळे सुरक्षेसोबतच इतर सर्व व्यवस्था चोख ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. 6 हजार फुटांवरच्या वातावरणात पुरेशा ऑक्सजिन सिलिंडर्ससोबतच मेडिकल बेड्स, रुग्णवाहिका आणि हेलिकॉप्टर्सचाही व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेमध्ये दहशतवादी कारवाया होऊ नयेत, यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र सरकारने आवश्यक ती सर्व पावले उचलल्याचे स्पष्ट केलं आहे.