बेळगावच्या जनतेला पुन्हा दिलासा
बेळगाव : महानगरपालिकेला विविध अडचणी भेडसावत आहेत. नुकसानभरपाईसाठी अनेकजण दावे दाखल करत आहेत. परिणामी मनपाला संबंधितांना नुकसानभरपाई द्यावी लागत आहे. त्यामुळे मनपाकडे आता आर्थिक टंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे मनपाच्या अधिकाऱ्यांनी राज्याच्या नगरविकास खात्याकडे कर भरण्यासाठी जनतेला सवलत द्यावी, अशी मागणी केली होती. नगरविकास खात्याने 14 सप्टेंबरपर्यंत कर भरण्यासाठी 5 टक्के सवलत पुन्हा दिली आहे. त्यामुळे बेळगावच्या जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
महानगरपालिकेच्या आर्थिक वर्षाला एप्रिलपासून प्रारंभ होतो. एप्रिलमध्ये जे नागरिक घरपट्टी भरतात त्यांना 5 टक्के सवलत दिली जाते. मात्र आता कर जास्तीजास्त जमा व्हावा यासाठी 14 सप्टेंबरपर्यंत 5 टक्के सवलत देण्यात येणार आहे. याबाबत राज्याच्या नगरविकास खात्याकडून महानगरपालिकेला याबाबतचे पत्र मिळाले आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी 15 दिवस सवलतीच्या दरात कर भरण्यासाठी मुभा मिळणार आहे.
यावर्षी मनपाला करवसुलीसाठी 73 कोटीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यामुळे उर्वरित 7 महिन्यांमध्ये हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मनपाचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करणार आहेत. यातच मनपाकडे जमा झालेल्या रकमेतील 20 कोटी रुपये शहापूर येथील जागामालकाला द्यावे लागणार आहेत. त्यामुळे मनपावर आर्थिक ताण पडणार आहे. केवळ एक महिना सवलत दिली जाते. त्यानंतर दंडासह कर जमा करण्यात येतो. मात्र यावर्षी महानगरपालिकेवर ओढवलेल्या आर्थिक संकटामुळे मनपाच्या अधिकाऱ्यांनी राज्याच्या नगरविकास खात्याकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार आता आणखी 15 दिवस सवलत दिली जाणार आहे.