प्रतिनिधी /बेंगळूर
लसीअभावी राज्यातील 50 टक्के लसीकरण केंद्रे बंद झाली आहेत. मागील 14 दिवसांपासून राज्यात सरासरी 2.56 जणांनाच लसीचे डोस देण्यात आले आहेत. ही बाब धक्कादायक असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली लस उत्सव केवळ जाहिरातीपुरतीच मर्यादीत आहे का, असा प्रश्न सिद्धरामय्या यांनी उपस्थित केला आहे. राज्यातील लसीकरण केंद्रांमध्ये येणाऱया शंभर जणांपैकी केवळ 20 जणांनाच लस मिळत आहे. मागणीच्या 20 टक्के प्रमाणातही लस उपलब्ध होत नाहीत, असे आरोग्य खात्यातील डॉक्टर सांगत आहेत. याविषयी कोणतीही प्रतिक्रिया न देणारे मुख्यमंत्री आणि हतबलता व्यक्त करणारे आरोग्यमंत्री दिल्लीकडे बोट करत आहेत, अशी परखड टीका त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. राज्यातील 8,500 लसीकरण केंद्रांपैकी अधिक केंद्रे ग्रामीण भागात आहेत. तेथे उपलब्ध होणाऱया लसी देखील राजकारणी आणि प्रभावी व्यक्तींच्या शिफारसीनुसार दिल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. ग्रामीण भागात आरोग्य केंद्रांसमोर लसीसाठी सकाळपासून रांगेत थांबलेल्यांना नंतर रिकाम्या हाती परतावे लागत आहे, असेही सिद्धरामय्या यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.