अफगाणिस्तानात दहशतवादी संघटनेचे सामर्थ्य वाढले
वृत्तसंस्था/ काबूल
अफगाणिस्तानातून अमेरिकेचे सैन्य माघार घेत आहे. अशा स्थितीत दहशतवादी संघटना तालिबान तेथील जिल्हय़ांवर कब्जा करत सुटले आहे. अफगाणिस्तान सैन्यासोबत चाललेल्या तुंबळ संघर्षानंतर तालिबानने कंदहारच्या पंजवाई जिल्हय़ावर कब्जा केला आहे. पंजवाई हा तालिबानचा यापूर्वी बालेकिल्ला होता. मे महिन्याच्या प्रारंभापासूनच अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या सैन्याने काढता पाय घेण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासूनच ग्रामीण भागांवर कब्जा करण्याचे सत्र तालिबानने आरंभिले आहे. तालिबानने आतापर्यंत 50 हून अधिक जिल्हय़ांवर नियंत्रण मिळविले आहे.
अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो सैन्याने दोन दिवसांपूर्वी काबूलनजीकचा बगराम वायुतळ रिकामी केला आहे. या वायुतळावरूनच तालिबान आणि त्याला मदत करणाऱया अल-कायदाच्या विरोधात 20 वर्षांपेक्षा अधिक काळापासून मोहिमा राबविण्यात येत होत्या. सध्या हा वायुतळ अफगाणिस्तान सैन्याच्या नियंत्रणात आहे.
पंजवाईचे महत्त्व
पंजवाई जिल्हा कंदहार शहरानजीक आहे. कंदहारमध्येच तालिबानची स्थापना झाली. हा त्याचा बालेकिल्ला राहिला असल्याने पंजवाईवर कब्जामुळे तालिबानचे सामर्थ्य वाढले आहे. यामुळे अफगाणिस्तान सैन्याच्या विरोधातील त्याची लढाई अधिक सोपी ठरू शकते.
भारताशी तालिबानशी चर्चा
भारत सध्या तालिबानच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. कतारची राजधानी दोहामध्ये भारतीय अधिकारी आणि तालिबानी नेत्यांदरम्यान चर्चा झाली आहे. कतारचे मुख्य प्रतिनिधी मुतलाक बिन मजीद अल कहतानी यांनी याची पुष्टी दिली आहे. तालिबानशी चर्चेसाठी भारतीय अधिकाऱयांनी दोहा दौरा केला आहे. तालिबान भविष्यात अफगाणिस्तानात मोठी भूमिका बजावणार असल्याचे प्रत्येकाला वाटते. याचमुळे प्रत्येक जण त्याच्याशी चर्चा करू इच्छितो. भारताने अफगाणिस्तानला मोठी मदत केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.