21 हजार कोटींच्या टायर्सची निर्यात
वृत्तसंस्था/ कोलकाता
आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये टायरची निर्यात 50 टक्के इतकी वाढून 21,178 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या आधीच्या वर्षामध्ये 14,000 कोटी रुपयांच्या टायरची निर्यात करण्यात आली होती. ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांनी यासंबंधीची माहिती वाणिज्य मंत्रालयाला दिली आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष सतीश शर्मा यांनी म्हटले आहे, की गेली दोन वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरोना महामारीमुळे टायर उद्योग प्रभावित झाला होता. असे असतानाही भारतातून 70 टक्के इतकी टायर निर्यात करण्यात आली. निर्यातीच्या बाबतीमध्ये भारताची ही जागतिक स्तरावरची कामगिरी निश्चितच कौतुकास पात्र अशीच ठरली आहे.
170 देशांना निर्यात
निर्मिती कंपन्यांनी भारतामध्ये नव्या तंत्रज्ञानासह टायर्सची निर्मिती केली असून यामुळेच विविध देशांमधून भारतातील टायर्सना मागणी वाढताना दिसते आहे. विविध देशांचा भारतीय उत्पादनाविषयी विश्वास वाढतो आहे, हेच या निर्यात वाढीवरून म्हणता येईल, असेही शर्मा यांनी म्हटले आहे. 170 हून अधिक देशांना भारतातून टायर्सची निर्यात केली जाते.