वाराणसी / वृत्तसंस्था
वाराणसीतील ज्ञानवापी कॅम्पसमध्ये शनिवारी पहिल्या दिवसाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सकाळी 8 वाजता सुरू झालेले सर्वेक्षण दुपारी 12 वाजेपर्यंत म्हणजेच 4 तास चालले. यादरम्यान सुमारे 50 टक्के सर्वेक्षण झाले असून आता दुसऱया दिवशी म्हणजे रविवारीही सर्वेक्षण केले जाणार आहे. मात्र, या सर्वेक्षणाबाबत पथकातील कोणत्याही व्यक्तीने भाष्य केलेले नाही. सुरुवातीला मुस्लीम बाजूने तळघराची चावी दिली नसल्याची चर्चा होती, मात्र पोलीस आयुक्तांनी ती फेटाळून लावली. दोन्ही पक्षांच्या उपस्थितीत पूर्ण सामंजस्याने सर्वेक्षण करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
अधिवक्ता आयुक्त अजय मिश्रा यांच्यासह फिर्यादी व प्रतिवादी यांच्या 52 जणांच्या पथकाने शनिवारी आवारातील चार तळघरांचे कुलूप उघडून तपास केला. या पथकाने भिंती आणि खांबांची व्हिडीओग्राफीही केली. आता रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून पुन्हा सर्वेक्षणाचे काम केले जाणार आहे. रविवारी वरच्या मजल्यावरील खोल्यांचे सर्वेक्षण केले जाईल.
जिल्हाधिकाऱयांकडून माहिती
सर्वेक्षणाच्या पहिल्या दिवसाचे काम शांततेत पूर्ण झाले आहे. दोन्ही बाजूंनी पूर्ण सहकार्य केले. कुठेही अडचण नसून ज्ञानवापी कॅम्पसच्या 50 टक्केपेक्षा जास्त भागांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्याचबरोबर कॅम्पसच्या व्हिडीओग्राफीसाठी खास कॅमेरे आणि लाईटची व्यवस्था करण्यात आली होती, असे जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी सांगितले. या पाहणीदरम्यान व्हिडीओग्राफी झाली, पण आत काय सापडले? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
पूर्णपणे गोपनीयता
सर्वेक्षणासाठी आवारात गेलेल्या संपूर्ण टीमचे मोबाईल बाहेर जमा करण्यात आले होते. सर्वेक्षणाशी संबंधित कोणतीही माहिती बाहेर येऊ नये, अशा सक्त सूचना पथकाला देण्यात आल्या आहेत. तळघरांचे व्हिडीओग्राफी करून बाहेर आलेल्या छायाचित्रकाराला प्रसारमाध्यमांनी विचारले असता, त्याने काहीही सांगण्यास नकार दिला.
सर्वसामान्यांना प्रवेशबंदी
न्यायालयाच्या कडक आदेशाच्या पार्श्वभूमीवर या सर्वेक्षणावेळी प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. ज्ञानवापी संकुलाच्या 500 मीटर परिसरात सार्वजनिक आणि माध्यमांना प्रवेश निषिद्ध करण्यात आला होता. सर्व दुकानेही बंद होती. आजूबाजूच्या घरांच्या छतावर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. एक किलोमीटरच्या परिघात 1,500 हून अधिक पोलीस-पीएसी कर्मचारी तैनात करण्यात आले होते. स्वतः डीएम कौशलराज शर्मा आणि पोलीस आयुक्त ए. सतीश गणेश संपूर्ण पाहणीदरम्यान घटनास्थळी उपस्थित होते. खुद्द आयुक्तांनीच फौजफाटा घेऊन परिसरात पथसंचलन केले.