मत्स्य खात्याकडून उत्पादनासाठी प्रयत्न : माशांची पिले तलावात
बेळगाव : माशांचे संवर्धन व्हावे आणि उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी मत्स्य खात्याकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. बुधवारी किल्ला येथील तलावात 50 हजार मत्स्यबीज (माशाची पिले) तर येळ्ळूर येथील जलाशयात 20 हजार मत्स्यबीज सोडण्यात आले आहे. यंदा झालेल्या समाधानकारक पावसामुळे तलाव आणि जलाशयांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला आहे. या पूरक परिस्थितीमुळे खात्याने मत्स्यबीज सोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील विविध जलाशयांमध्ये आणि तलावांमध्ये मत्स्य खात्यामार्फत मत्स्यबीज सोडले जात आहे. हराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या किल्ला तलावातही कटला, गिरमल, राहू आणि मृगळ जातीच्या माशांची पिले सोडण्यात आली आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामात साहजिकच मत्स्योत्पादनात वाढ होणार आहे. साधारण जून ते
ऑगस्टदरम्यान माशांचा प्रजनन काळ असल्याने या काळात मत्स्यबीज सोडण्यासाठी प्राधान्य दिले जाते. यानुसार मत्स्य खात्याने विविध तलावांमध्ये मत्स्यबीज सोडण्याचे काम हाती घेतले आहे. गतवर्षी पावसाअभावी जलाशये आणि तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाला नव्हता. त्यामुळे मत्स्यबीज सोडण्याचे काम रेंगाळले होते. शिवाय कमी प्रमाणात माशांची पिले सोडण्यात आली होती. त्यामुळे एकूण उत्पादनातही घट झाली होती. मात्र, यंदा जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे तलाव आणि जलाशयांची पाणीपातळी उच्चांकाने वाढली आहे. या संधीचा फायदा घेत मत्स्य खात्याने हिडकल, राकसकोप आणि नविलुतीर्थ यासह इतर जलाशयांमध्ये मत्स्यबीज सोडले आहे. शिवाय येत्या काळात पुन्हा माशांची पिले आणून सोडण्याची तयारी केली आहे. विविध जलाशये आणि तलावांमध्ये सोडलेली माशांची पिले चार-पाच महिन्यात साधारण एक किलो वजनाची होणार आहेत. त्यानंतर ती विक्रीसाठी काढली जाणार आहेत, अशी माहिती मत्स्य खात्याने दिली.
मत्स्योत्पादन…
हंपी आणि इतर ठिकाणांहून आणलेले मस्त्यबीज किल्ला तलाव आणि यरमाळ येथील जलाशयात सोडण्यात आले आहे. त्याबरोबरच इतर ठिकाणीही जलाशये आणि तलाव भाडेतत्त्वावर घेण्यात आले आहेत. या ठिकाणी मत्स्यबीज सोडले जाणार आहे.
– गंगनल्ली,अधिकारी, तालुका मत्स्य खाते