सर्वात मोठा बॉम्ब : क्षणार्धात विमानतळ -बंकर उडवून देण्याची क्षमता; सुखोई आणि जग्वार फायटरमधूनही हल्ल्यासाठी सक्षम
जबलपूर / वृत्तसंस्था
जबलपूरच्या खमारिया ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये (ओएफके) 500 किलो वजनाचे जीपी बॉम्ब (जनरल पर्पज बॉम्ब) तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. जीपी बॉम्बची पहिली ऑर्डर शुक्रवारी हवाई दलाकडे पाठवण्यात आली. हे बॉम्ब इतके विनाशकारी आहेत की आकाशातून पडल्यानंतर ते सर्वात मोठे बंकर उद्ध्वस्त करू शकतात. या बॉम्बने केलेल्या हल्ल्याद्वारे शत्रूराष्ट्राचे कोणतेही विमानतळ किंवा मोठा बंकर क्षणार्धात उडवून दिले जाऊ शकते. साहजिकच या बॉम्बमुळे हवाई दलाची ताकद आणखी वाढली आहे.
500 किलो वजनाचा जीपी बॉम्ब हा भारतातील सर्वात मोठा बॉम्ब असल्याची माहिती कारखान्याच्या सूत्रांनी दिली. त्याची लांबी 1.9 मीटर आणि वजन 500 किलो आहे. हा बॉम्ब जग्वार आणि सुखोई ‘एसयू-30 एमकेआय’वरून टाकला जाऊ शकतो. हा बॉम्ब जबलपूर येथील आयुध निर्माणी कारखान्याच्या एफ-6 विभागात तयार करण्यात आला आहे.
ओएफकेला पोहोचलेले हवाई दलाचे पथक 48 बॉम्ब घेऊन डेपोकडे रवाना झाले. या बॉम्बची संपूर्ण रचना आणि निर्मिती कारखान्यातच झाली आहे, हे ‘ओएफके’साठी देखील विशेष आहे. 500 किलोच्या जीपी बॉम्बमुळे हवाई दलाची ताकद आणखी वाढेल, असा दावा ओएफकेचे महाव्यवस्थापक एसके सिन्हा यांनी केला आहे. सामरिक दृष्टिकोनातून जीपी बॉम्ब भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जीपी बॉम्बमुळे भारतीय लष्कराला युद्धात विजय तर मिळेलच, पण त्यामुळे भारतीय लष्कराची सुरक्षा क्षमताही सुधारणार असल्याची माहिती देण्यात आली. ‘ओएफके’च्या व्यवस्थापकीय संचालकांनी पहिल्या बॅचमधील 48 बॉम्ब हवाई दलाच्या स्वाधीन केले आहेत.
डीआरडीओने तंत्रज्ञान विकसित
डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (डीआरडीओ) हा बॉम्ब विविध टप्प्यांमध्ये विकसित केला आहे. प्रत्येक बॉम्बमध्ये 10,300 15-मिमी स्टीलचे गोळे (बुलेट्स) बसवले आहेत. स्फोटानंतर, प्रत्येक कवच 50 मीटरपर्यंतच्या लक्ष्यांवर मारा करेल. विशेष बाब म्हणजे स्टीलचे गोळे 12 मिमीच्या स्टील प्लेटमध्येही प्रवेश करू शकतात. यामुळे भारताची सामरिक ताकद मोठय़ा प्रमाणात वाढेल.