कर्नाटकातील एका माजी मंत्र्याच्या कन्येच्या विवाहाची ही कहाणी आहे. हा भारतातला सर्वात महागडा विवाह असल्याची चर्चा आहे. त्यासाठी 500 कोटी किंवा त्याहीपेक्षा जास्त रुपयांचा खर्च आल्याची बोलवा आहे. एखाद्या राजघराण्यातील विवाहालाही लाजवेल, अशा प्रकारे पाण्यासारखा पैसा या विवाहात खर्च करण्यात आला. निमंत्रितांची संख्या 50 हजाराहून अधिक होती. त्यांच्या आदरातिथ्यात कोणतीही उणीव राहू नये, याची पूर्ण दक्षता घेण्यात आली होती.
लग्नाच्या वेळी वधूला जी साडी नेसविण्यात आली होती, तिची किंमत कोटय़वधी रुपये असावी, असे अनुमान आहे. या रेशमी साडीची जर शुद्ध सोन्याची होती. साडीची किंमत 17 कोटी असावी, असे जाणकारांचे मत आहे. तसेच वधूच्या शृंगारासाठी किमान 30 लाख रुपये खर्च आला असावा, असे बोलले जाते. वधूसाठी 90 कोटी रुपयांचे सोन्याचे आणि हिऱयाचे दागदागिने बनविण्यात आले होते. अशा वधूला पाहून निमंत्रित थक्क झाले होते. निमंत्रितांच्या भोजनासाठी किती प्रकारचे पदार्थ बनविण्यात आले होते, याची गणती करणेही अशक्य होते. केवळ मिठायांचे प्रकारच 50 हून अधिक असावेत. निमंत्रितांच्या भोजनासाठी प्रत्येक ताटामागे 3 हजार रुपये खर्च करण्यात आले होते. हा विवाह समारंभ एका मोठय़ा पटांगणात पार पडला. पटांगणाच्या प्रवेशद्वारापासून विवाह स्थळापर्यंत निमंत्रितांना नेण्यासाठी उत्कृष्टरीत्या सजविलेल्या 40 बैलगाडय़ांची सोय करण्यात आली होती. निमंत्रितांचा हा बैलगाडी प्रवास या विवाह समारंभाचे विशेष वैशिष्टय़ ठरला होता. भारताची ख्यातनाम फॅशन डिझायनर नीता लुल्ला यांनी वधूची वेशभूषा तयार केली होती. वधूचा शृंगार करणाऱया तज्ञाला सहा लाख रुपयांचे मानधन दिले गेले, अशीही चर्चा आहे. एकंदर हा विवाह उपस्थितांच्या कायमचा स्मरणात राहील, अशी व्यवस्था करण्यात आली होती.