ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई पोलिस दलातील तीन हवालदारांना ‘कोरोना’मुळे प्राण गमवावे लागल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार आता 55 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस खात्यातील जेष्ठ कर्मचाऱ्यांना घरीच थांबण्याचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी, ज्यांचे वय 55 पेक्षा जास्त आहे, त्यांनी बंदोबस्तामध्ये सहभागी होऊ नये अशी सूचना दिली आहे.
हवालदारांना स्वतःहून कामास यायची इच्छा असेल तर त्यांना येऊ द्यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच गंभीर शारीरिक आजार असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील घरी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गेले सलग तीन दिवस दररोज एका पोलिस कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे हे सर्व पोलिस कर्मचारी 50 वर्षे वयापेक्षा जास्त वयाचे होते. 55 वर्षापेक्षा अधिक वयाच्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पोलिस आयुक्तांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.