नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सारा देश प्रतीक्षेत असणाऱया 5 जी मोबाईल आणि इंटरनेट सेवेचा येत्या ऑगस्टपासून देशात प्रारंभ होत आहे. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या आठवडय़ातच ही माहिती दिली होती. मंगळवारी दूरसंचार विभागानेही तिचा पुनरुच्चार केला. 5 जी च्या स्पेक्ट्रमची विक्री सुरु झाली असून जूनपर्यंत ही विक्री प्रक्रिया संपणार आहे. त्यानंतर दोनच महिन्यांमध्ये ही सेवा देण्यास प्रारंभ केला जाईल. टप्प्याटप्प्याने संपूर्ण देशात ती विस्तारली जाणार आहे.
5 जी ही वायरलेस ब्रॉडबँड सेवा आहे. ती अतिशय वेगवान सेवा असून वायरलेस असल्याने सुलभ आहे. ती तीन फ्रिक्वेन्सीमध्ये उपलब्ध होईल. लो फ्रिक्वेन्सी बँड (100 एमबीपीएस), मिड फ्रिक्वेन्सी (1.5 जीबीपीएस) आणि हाय फ्रिक्वेन्सी (20 जीबीपीएस) अशा तीन फ्रिक्वेन्सीमध्ये ती मिळेल.
साडेसात लाख कोटी रुपये
ही सेवा देण्यासाठी साडेसात लाख कोटी रुपयांच्या स्पेक्ट्रमचा लिलाव केला जाणार आहे. ट्राई कडूनही यासंबंधी सूचना आल्या आहेत. ट्राईने साडेसात लाख कोटी रुपयांच्या 1 लाख मेगाहर्टझ् स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची सूचना दिली होती. या स्पेक्ट्रमचे कार्यायुष्य (व्हॅलिडीटी) 30 वर्षांचे असेल. स्पेक्ट्रम लिलावाला समाधानकारक प्रतिसाद मिळेल अशी केंद्र सरकारची अपेक्षा आहे.