नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराक्रमाची विजयगाथा साकारणाऱया भारतीय संघातील 6 खेळाडूंना आपण अलिशान एसयूव्ही (स्पोर्टस् युटिलिटी व्हायकल) प्रदान करणार असल्याचे उद्योगपती आनंद महिंदा यांनी जाहीर केले. ट्वीटरवर त्यांनी शनिवारी ही घोषणा केली. या 6 क्रिकेटपटूंमध्ये शार्दुल ठाकुर, शुभमन गिल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन यांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिकाविजय संपादन केल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू टप्प्याटप्प्याने मायदेशी दाखल झाले आणि त्यांचे वेगवेगळय़ा ठिकाणी अगदी जंगी स्वागत केले गेले. त्यांच्या या पराक्रमाची आनंद महिंद्रा यांनीही खास पद्धतीने दखल घेतली व अलिशान कार देऊन आपण संघातील 6 खेळाडूंचा सन्मान करणार असल्याचे ते म्हणाले.
महिंदा यांनी शनिवारी केलेल्या 3 ट्वीटमध्ये खेळाडूंच्या पराक्रमाचा उल्लेख केला. ‘नव्या पिढीसमोर या पराक्रमाचा आदर्श असेल. स्वप्ने पहा आणि अशक्य असलेले शक्य करुन दाखवा, अशी प्रेरणा त्यांनी युवा पिढीला दिली आहे’, असे महिंद्रा आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत सिराजने भारतीय संघातर्फे सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम केला. त्याने 3 सामन्यात 13 बळी घेतले. शार्दुल व वॉशिंग्टन यांनी ब्रिस्बेनमधील शेवटच्या कसोटीत फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर लक्षवेधी योगदान दिले होते आणि याचमुळे भारताला ऑस्ट्रेलियाची 32 वर्षे अपराजित राहण्याची परंपरा खंडित करता आली होती.
शार्दुल व वॉशिंग्टन यांनी 7 व्या गडय़ासाठी 123 धावांची भागीदारी साकारली. या जोडीने भारतीय संघातर्फे 30 वर्षांपूर्वीचा विक्रमही येथे मोडित काढला होता. याच लढतीतील पहिल्या डावात नटराजनने 78 धावात 3 बळी, असे पृथक्करण नोंदवले होते. याशिवाय शुभमन गिलची दुसऱया डावातील 91 धावांची झुंजार खेळी महत्त्वाची ठरली होती. सैनी शेवटच्या सामन्यात खेळला नाही. पण, मालिकेत त्यानेही 2 सामन्यात 4 बळी घेतले. त्याच्यासाठी ही पदार्पणाची मालिका होती.