दोन अपघातांत पाच जणांवर काळाचा घाला : 8 रोजी झाला होता पहिला मृत्यू
प्रतिनिधी / डिचोली
यंदाचा फेब्रुवारी महिना वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत आहे. डिचोली तालुक्यात गेल्या आठ दिवसांत सहा जणांचे अपघातांमध्ये बळी गेल्याची नोंद झालेली आहे. यापैकी दि. 8 फेब्रु. रोजी पहिला अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर नेमक्या आठव्या दिवशी दि. 15 रोजी आणखी तिघेजण अपघातात ठार झाले. 9 फेब्रु. रोजी नानोड येथे झालेल्या कदंब बस व अल्टो कार यांच्या अपघातात दोघांनी जीव गमावला होता. तर त्यातील गंभीर जखमी असलेल्या एकाचा बुधवारीच संध्याकाळी मृत्यू झाला.
गेल्या सोम. दि. 6 फेब्रु. रोजी रात्री शेट्योवाडा मेणकुरे येथे आपल्या घरी जाताना दुचाकीवरून ताबा सुटून पडलेल्या सतीश सदा शेट्यो (वय 45) यांच्या डोक्याला जबर मार बसला होता. त्यांना तत्काळ बांबोळी येथे गोमेकॉत उपचारासाठी हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना बुध. दि. 8 फेब्रु. रोजी त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्या पार्थिवावर गुरु. दि. 9 रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
9 फेब्रु रोजीच्या आपघातातील बळींची संख्या तीन
8 फेब्रु. रोजीच्या अपघातात एकाच्या मृत्यूच्या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरू. दि. 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वा. नानोडा येथे पूजा गेस्ट हाऊसजवळ कदंब बस व अल्टो कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सासरा व सून यांचे निधन झाले होते. वरचावाडा साळ येथील महादेव सावळाराम राऊत यांचे डिचोली सरकारी सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल होण्यापूर्वीच निधन झाले. तर त्यांची सून सोनाली राऊत यांचे डिचोली इस्पितळात निधन झाले. या अपघातातील अन्य दोन जखमींना बांबोळी येथील गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. त्यातील गंभीर जखमी असलेल्या आशिष अनंत परब (साळ) यांचे उपचारादरम्यान बुध. दि. 15 रोजी संध्याकाळी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात निधन झाले. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या आता तीन झाली आहे. तर या अपघातात जखमी झालेल्या मयत सोनली राऊत यांची आई बांदा सिंधुदुर्ग येथील शुभदा रेडकर यांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात येते.
15 फेब्रु. दोघे जागीच ठार बळी, तर एकाचा इस्पितळात मृत्यू
या 8 व 9 फेब्रु. रोजीच्या अपघाती मृत्यू प्रकरणांनंतर नेमक्या आठव्या दिवशीच म्हणजे बुध. दि. 15 रोजी नवेदार सुपाचीपुड हरवळे सांखळी येथे घडलेल्या अपघातात एक ट्रकने तरुण दाम्पत्यावर घाला घातला. किशोर नाईक व त्याची पत्नी अर्चना नाईक हे दोघेही जागीच ठार झाले. तर मुलगा सुदैवाने बचावला. या अपघाती मृत्यूंची घटना ताजी असतानाच संध्याकाळी नानोड्यातील अपघातात जखमीच्या मृत्यूची बातमी समोर आली. त्यामुळे या एकाच दिवशी तीन अपघाती बळी गेले.