गुळे येथे दरड कोसळली, पैंगीण येथे हाद दुरीग नाल्याजवळ साचलेले पाणी घरांत जाण्याची भीती
प्रतिनिधी /काणकोण
काणकोण तालुक्यात मागच्या दोन दिवसांत पावसाने जनजीवन पुरते विस्कळीत करून टाकले असून 5 रोजी एकाच दिवसात 6 इंच इतक्या पावसाची नोंद काणकोण तालुक्यात झालेली आहे. सतत पडणाऱया पावसात कित्येक ठिकाणी रस्त्यावर झाडे पडली आहेत. नव्यानेच उभारलेल्या बार्से पुलाजवळचे डांबरीकरण उखडले असून त्या ठिकाणी डबक्यांचे स्वरूप आले आहे.
मडगाव-कारवार मार्गावरील गुळे येथील भूमिपुरुष देवालयाजवळ दरड कोसळली आहे. पैंगीणच्या हाददुरीग नाल्याजवळ पाणी साचले असून अशीच परिस्थिती राहिल्यास या ठिकाणच्या शेताजवळ असलेल्या घरांत पाणी शिरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दोन वर्षांपूर्वी या ठिकाणच्या नदीचा विचार करून आणि भातशेतीच्या संरक्षणासाठी संरक्षक भिंत जलस्रोत खात्याने उभारली होती. या भिंतीच्या सदोष बांधकामामुळे शेतातील पाणी नदीत जाण्याच्या ऐवजी नदीतील पाणी उलटय़ा दिशेने परत शेतात येत असते. या बांधकामाने पाण्याच्या प्रवाहाची दिशाच बदलून टाकली असल्याची माहिती येथील एक नागरिक व्यंकटराय नाईक यांनी दिली.
त्याचप्रमाणे पैंगीण बाजार ते हाददुरीगपर्यंतच्या रस्त्याची उंची वाढविण्यात यावी. मागच्या 50 वर्षांत झाली नव्हती अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली असून जलस्त्रोत खात्याच्या नियोजनशून्य कारभाराचा परिणाम या भागातील नागरिकांना आता भोगावा लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया माजी सरपंच रामदास पुजारी यांनी व्यक्त केली आहे. तर गालजीबाग नदीच्या काठावरील वाढलेली झुडुपे कापण्यात यावीत आणि नदीत साचलेला गाळ काढण्यात यावा यासंबंधीचे लेखी निवेदन आपण मागच्या वर्षीच जलस्रोत खात्याला दिले होते. परंतु अशा आवश्यक त्या गोष्टींकडे सरकारचे अजिबात लक्ष नाही, अशी टीका माजी पंच प्रवीर भंडारी यांनी केली आहे.
तालुक्यातील सर्व नद्या आता दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. बऱयाच भागांतील गटारांची कामे न झाल्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहू लागले आहे. काणकोण पालिका क्षेत्रात मान्सूनपूर्व कामाचा भाग म्हणून गटारांची सफाई करण्याचे काम पालिकेने केले असले, तरी पावसाचे पाणी वाहून जाणाऱया वाटा बंद झाल्यामुळे हे पाणी रस्त्यावर येऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. पावसाचे पाणी यापूर्वी सरळ समुद्रात जाण्याची सोय होती. त्या वाटाच मिळेल त्या ठिकाणी बांधकामे करून बंद करण्यात आल्या आहेत. त्याचा सर्वाधिक परिणाम पाळोळे, चार रस्ता, कदंब बसस्थानक, चावडी, पालिका मार्केट, पणसुले या भागांवर झालेला आहे.
तीन मच्छीमारांना वाचविले
काणकोणच्या मामलेदार त्याचप्रमाणे उपजिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष 24 तास जनतेसाठी खुला ठेवण्यात आलेला असून या ठिकाणी कसलाच अनुचित प्रकार घडल्याची नोंद नसल्याची माहिती मामलेदार कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे. वेधशाळेने 4 पासून राज्यात ऑरेंज ऍलर्ट घोषित केलेला असताना पाळोळे येथील काही मच्छीमार समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. त्यातील तीन व्यक्तींना दृष्टीच्या जीवरक्षकांनी वाचविले आहे. आणखी चार पाच-दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून मच्छीमारांनी धोका पत्करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.