मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सरकार पाठिशी असल्याचा दिला संदेश
प्रतिनिधी / बेळगाव
न्याय हक्कांसाठी चालविलेला लढा मराठी बांधवांनी 65 वर्षांनंतरही धगधगता ठेवला आहे. भाषा, संस्कृती टिकविण्यासाठी सीमाबांधव रस्त्यावरच्या लढाईसोबत न्यायालयीन लढाई लढत आहेत. 65 वर्षे ओलांडली तरी सीमालढा अधिक ज्वलंत होत चालला आहे. आजही आम्हाला महाराष्ट्रात जायची आस आहे, या आपल्या भावनांचे दर्शन पुन्हा एकदा सीमाबांधवांनी काळय़ा दिनाच्या माध्यमातून घडविले आहे. यावषी सायकलफेरीला परवानगी मिळाली नाही परंतु मागे न हटता केंद्र सरकारचा निषेध करत सीमाप्रश्न ज्वलंत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मध्यवर्ती म. ए. समितीने मराठा मंदिर येथे तर शहर म. ए. समितीने मराठा कॉलनी येथे निषेध व्यक्त केला.
महाराष्ट्र एकीकरण समितीने दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरवासियांनी रविवारी कडकडीत हरताळ पाळला. काळे कपडे, फेटे, टोप्या, मास्क, झेंडे या माध्यमातून झालेल्या अन्यायाचा निषेध करण्यात आला. पोलिसांची दडपशाही झुगारून काळा दिन पाळण्यात आला. ‘बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, जय भवानी, जय शिवाजी, बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’ या घोषणांनी सीमावासियांच्या रोमारोमात उत्साह संचारला होता.
सायकलफेरीला परवानगी न मिळाल्यामुळे अखेर मराठा मंदिर येथे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरवषी हजारोंच्या संख्येने सायकल फेरीमध्ये सीमाबांधव सहभागी होऊन आपला रोष व्यक्त करत असतात. परंतु यावषी परवानगी नसली तरीही निवडक मराठी भाषिकांनी संपूर्ण सीमाभागाचे प्रतिनिधीत्व केले. प्रशासनाचा हटवादीपणा झुगारून काळा दिन यशस्वी केला. या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर व शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांची उपस्थिती होती.
सीमाप्रश्न हा फक्त बेळगावचा नसून तो संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सीमाप्रश्नासाठी मोठे योगदान दिले आहे. आज महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाने काळय़ा फिती बांधून आम्ही सीमावासियांच्या पाठिशी आहोत हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. बेळगावमध्ये चाललेल्या हुकूमशाहीचा निषेध असून असे कितीही प्रकार झाले तरी मराठी भाषिक त्याला डगमगणारे नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे आपली भाषा व संस्कृतीचे रक्षण करण्याचे अधिकार दिले आहेत. परंतु येथे या अधिकारांची पायमल्ली होत असून हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिला.
पुढील वर्षी काळादिन नाही तर महाराष्ट्र दिन
सीमा समन्वय मंत्री छगन भुजबळ, एकनाथ शिंदे यांनी सीमाप्रश्नासाठी तुरुंगवास भोगला, त्यामुळे त्यांना येथील परिस्थितीची जाण आहे. येथील प्रशासन सीमावासियांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालत आहे. काळे कपडे घातले, ट्विटरवर टेंड चालविला म्हणून युवकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. परंतु ही दडपशाही फार दिवस चालणार नाही. महाराष्ट्र सरकार भक्कमपणे सीमावासियांच्या सोबत असून, पुढील वषी काळा दिन नाही तर महाराष्ट्र दिन साजरा करू, अशी ग्वाही शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली.
एकनाथ शिंदेंनी सीमावासियांना पाठविला संदेश
सीमावासीय मागील 65 वर्षांपासून आपली भाषा व संस्कृतीसाठी लढा देत आहेत. सीमाभागातील चौथी पिढी या लढय़ाचे नेतृत्व करत आहे. हा प्रश्न लवकर सोडवून संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात आणण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न आहे. शिवसेना संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात असून, सीमावासियांच्या सोबत आहे, असा संदेश महाराष्ट्राचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगेश चिवटे यांच्याकडून पाठवून दिला होता. याचे वाचन चिवटे यांनी सीमावासियांना करून दाखविले.
या सभेवेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, प्रकाश मरगाळे, माजी महापौर मालोजी अष्टेकर, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, माजी नगरसेवक नेताजी जाधव, मनोहर हलगेकर, राजू बिर्जे, दिनेश रावळ, माजी आमदार मनोहर किणेकर, ऍड. राजाभाऊ पाटील, जि. पं. माजी सदस्य रामचंद्र मोदगेकर, तालुका पंचायत सदस्य आप्पासाहेब कीर्तने, ज्ये÷ कार्यकर्ते रामा शिंदोळकर, महादेव पाटील, रामा भिंगवडे, शंकर पाटील, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस श्रीकांत कदम, आर. आय. पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर, उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर यांच्यासह सीमाबांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कार्यकर्त्यांची ठिकठिकाणी अडवणूक
म. ए. समितीचे कार्यकर्ते सभेच्या स्थळी पोहोचू नयेत यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करण्यात आले होते. कार्यकर्त्यांना हुसकावून माघारी धाडण्याचे प्रकार घडत होते. काळे कपडे घातलेल्यांची कसून चौकशी केली जात होती. गोगटे उड्डाणपूल, गोवावेस येथे रस्ता बंद करण्यात आला होता. या दडपशाहीविरोधात कार्यकर्त्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता.
काळे मास्क घालून करण्यात आला निषेध
यावषी कोरोना असल्यामुळे मास्क परिधान करणे अपरिहार्य आहे. सभेच्या स्थळीही सामाजिक अंतर पाळत म. ए. समितीने नियोजन केले होते. यावषी मास्क घालणे बंधनकारक असल्याने काही कार्यकर्त्यांनी काळय़ा रंगाचे मास्क घालून अनोखा निषेध नोंदविला. बेळगाव महाराष्ट्राचेच असे लिहिलेले टी-शर्ट घालून तरुणाईने आपला रोष व्यक्त केला.
रेणु किल्लेकर यांनी करवे कार्यकर्त्याला दिले प्रत्युत्तर
शांततेच्या मार्गाने काळय़ा दिनाची सभा सुरू असताना या ना त्या कारणाने करवेकडून कुरघोडय़ा करण्याचा प्रयत्न सुरू होता. सभास्थळी लाल पिवळा झेंडा घेऊन दाखल झालेल्या करवे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले तरीही तो घोषणा देत होता. हे पाहून माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांना राग अनावर झाला. त्यांनीही त्या कार्यकर्त्याला प्रत्युत्तर देत ‘बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ अशी घोषणा दिली. यामुळे त्या करवे कार्यकर्त्याला मान खाली घालून पोलिसांच्या वाहनात बसावे लागले.