राज्यातील मंगळवारी 101 नव्या रुग्णांची भर : 43 जणांना डिस्चार्ज
प्रतिनिधी/ बेंगळूर
परप्रांतातून कर्नाटकात परतलेल्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, राजस्थानबरोबरच आता झारखंडमधून राज्यात आलेल्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग आढळला आहे. राज्यातील एकूण रुग्णांपैकी 69 टक्के रुग्ण हे परराज्य व परराष्ट्रातून आलेले आहेत. मंगळवारी राज्यात 101 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 2283 वर पोहोचली आहे.
याच दरम्यान, राज्यात आतापर्यंत 748 जण संसर्गमुक्त झाले आहेत. मंगळवारी 43 जण बरे झाले आहेत. तर 1489 जणांवर विविध इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. त्यातील 18 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 44 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर दोघा कोरोनाबाधितांनी आत्महत्या केली आहे.
कोणत्या जिल्हय़ात किती नवे रुग्ण?
चित्रदुर्ग जिल्हय़ात 20, यादगिरमध्ये 14, बेळगाव व हासन जिल्हय़ात प्रत्येकी 13, दावणगेरे 11, बिदर 10, विजापूरमध्ये 6, उडुपी व मंगळूर जिल्हय़ात प्रत्येकी 3, बेंगळूर शहर व कोलारमध्ये प्रत्येकी 2, बागलकोट, चिक्कबळ्ळापूर, कोप्पळ आणि बळ्ळारी जिल्हय़ात प्रत्येकी 1 नव्या रुग्णाची भर पडली आहे. तसेच चौघे कतार आणि जकार्ता येथील नागरिक आहेत. दरम्यान, राज्यातील 10 जिल्हय़ांमधील बाधितांचा आकडा शंभर पार झाला आहे.
चित्रदुर्गमध्ये आढळून आलेले सर्व 20 नवे रुग्ण हे तामिळनाडूतून आलेले आहेत. तर बेळगावमध्ये पॉझिटिव्ह आढळलेले 13 जण झारखंडला जाऊन आले आहेत. तर हासनमधील 13 पॉझिटिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रातून आलेले आहेत. यादगिरमधील सर्व 14 रुग्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत. तर कतारमधून आलेल्या 30 जणांपैकी चौघेजण कोरोनाग्रस्त आढळले आहेत.
बिदरमध्ये एकाच कुटुंबातील 10 जण पॉझिटिव्ह
बिदर जिल्हय़ातील रुग्णसंख्याही वेगाने वाढत आहे. या जिल्हय़ात मंगळवारी आढळून आलेले 10 कोरोनाबाधित हे एकाच कुटुंबातील आहेत. ते महाराष्ट्रातून परतलेले आहेत. त्यांच्यावर बिदर जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.