पृथ्वी वाचविण्यासाठी पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन आवश्यक आहे. हा संदेश जगभरात पोहोचविण्याचे ध्येय महाराष्ट्रातील सुनील साहेबराव थोरात या तरुणाने ठेवले होते. या ध्यासापोटी त्याने नुकतीच 7 हजार 850 किलोमीटरची सायकलयात्रा पूर्ण केली. सुनील थोरात हे आपल्या देवडावा गावात सेंद्रिय शेती करतात. तसेच महाराष्ट्रातील संभाजीनगर शहरातील पर्यटनस्थळांमध्ये ते मार्गदर्शकाचे कामही करतात. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. हा सायकलयात्रेचा प्रकल्प त्यांनी आपल्या शिक्षकांकडून प्रेरणा घेऊन सुरू केला. शिक्षकांनी त्यांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
या सायकलयात्रेत त्यांनी दहा राज्यांमधून 7 हजार 850 किलोमीटरचा प्रवास केला. बुधवारी ते दिल्लीत पोहोचले. आतापर्यंत सायकलचे तीन टायर आणि पाच टय़ूब कामी आले आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली. त्यांना प्रेरणा देणाऱया शिक्षकांनीच या यात्रेसाठी त्यांना 20 हजार रुपयांची साडेसात किलो वजनाची सायकल भेट म्हणून दिली. त्यांनी केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगना, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश इत्यादी दहा राज्ये पालथी घातली आहेत. दिल्लीहून ते हिमाचल प्रदेश, जम्मू, लेह आणि कारगिल येथे जाणार आहेत. ते प्रतिदिन सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सायकल चालवतात. वाटेत काही काळ विश्रांती व हलका आहार घेतात. सध्याच्या कोरोनाकाळात प्रकृतीचीही विशेष काळजी घ्यावी लागते. आहारामध्ये प्रामुख्याने फळे, द्रवपदार्थ आणि शक्तीवर्धक वस्तूंचा समावेश असतो. जड आहार ते टाळतात.