पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीची हसीना यांच्याकडून प्रशंसा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारत आणि बांगला देश यांच्यात सात महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले असून दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसीना सध्या भारताच्या 3 दिवसांच्या दौऱयावर असून या दौऱयाच्या दुसऱया दिवशी हे करार करण्यात आले.
तत्पूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यात द्विपक्षीय संबंधांवर सविस्तर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांच्या स्वाक्षरीने हे सात सामंजस्य करार करण्यात आले. नद्यांचे पाणी वाटप, रेल्वे, अंतराळ संशोधन, विज्ञान-तंत्रज्ञान आणि न्यायव्यवस्था आदी विषयांवर हे करार करण्यात आले. दोन्ही नेत्यांमध्ये दिल्लीच्या हैदराबाद हाऊस येथे चर्चा झाली. नंतर तेथेच करारावर संबंधित नेते आणि अधिकाऱयांनी त्यांच्या स्वाक्षऱया केल्या.
शिष्टमंडळांसह चर्चा
पंतप्रधान मोदी आणि शेख हसीना यांच्यात थेट चर्चा होऊन करारांवर स्वाक्षऱया करण्यात आल्यानंतर दोन्ही नेत्यांनी भारताच्या आणि बांगला देशच्या अधिकाऱयांच्या शिष्टमंडळांसह संयुक्त चर्चा केली. बांगला देश हा भारताचा दक्षिण आशियातील सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहे. दोन्ही देशांमधील संपर्क आणि व्यापार यामुळे दोन्ही देशांची भरभराट होईल, अशी अपेक्षा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली. शेख हसीना यांनीही त्याला दुजोरा दिला.
दहशतवादविरोधात एकत्र
दोन्ही देश दहशतवाद आणि धार्मिक कट्टरतेच्या विरोधात एकत्र काम करणार आहेत. 1971 मध्ये भारताने पाकिस्तानला युद्धात धूळ चारुन बांगला देशला स्वातंत्र्य मिळवून दिले होते. ती भावना कायम ठेवून दोन्ही देश दहशतवाद आणि कट्टरता शक्तींच्या विरोधात कार्य करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या दुष्टशक्तींचा दोन्ही देशांना धोका आहे, यावर दोन्ही देशांचे एकमत आहे. त्यामुळे या क्षेत्रात सहकार्य अत्यावश्कय असल्याचे दोन्ही देशांनी ठरविले आहे.
दूरदृष्टीचा दोन्ही देशांना लाभ
पंतप्रधान मोदींच्या काळात भारत आणि बांगला देश यांच्यातील अनेक दीर्घकाळ प्रलंबित असणाऱया मुद्दय़ांचे निराकरण करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीमुळे आणि सहकार्य करण्याच्या भावनेमुळे हे शक्य झाले. दोन्ही देशांमधून वाहणाऱया कुशियारा नदीच्या पाणीवाटपाचा प्रश्न त्यामुळेच यशस्वीरित्या सुटला आहे. भविष्यातही तोडगे निघतीलच असा विश्वास हसीनांनी व्यक्त केला.
‘अमृत’काळात संबंधांचा उत्कर्ष
भारताने स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण केली असून आता स्वातंत्र्याच्या शताब्दीकडे वाटचाल होत आहे. 25 वर्षांच्या या ‘अमृतकाळा’त भारत आणि बांगला देश यांच्यातील संबंधांचा अधिकाधिक उत्कृर्ष होईल, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. हसीना यांच्याशी चर्चेनंतर त्यांनी द्विपक्षीय संबंधांवर समाधान व्यक्त करताना दोन्ही देशांचे भवितव्य एकमेकांशी जोडले गेल्याचे स्पष्ट केले. पंचवीस वर्षांमध्ये संबंध उत्तुंग होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्वाक्षऱया झालेले सात करार…
ड कुशियारा नदीच्या पाणीवाटपासंबंधीच्या कराराला अंतिम स्वरुप देण्यासाठी लवकरच बैठक घेण्याचा निर्णय
ड दोन्ही देशांमधील विज्ञान आणि उद्योग संशोधन मंडळांचा परस्पर सहकार्याचा करार आणि त्याचे क्रियान्वयन
ड भोपाळ येथील न्यायिक अकादमी आणि बांगलादेशच सर्वोच्च न्यायालय यांच्यात क्षमता संवर्धन करार
ड बांगला देशचे रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रशिक्षित करण्याचा दोन्ही रेल्वेमंडळांमध्ये सामंजस्य करार
ड बांगला देश रेल्वेला माहिती तंत्रज्ञान विषयक साहाय्य आणि समस्या निवारण पुरविण्याचा महत्वपूर्ण करार
ड प्रसार भारती आणि बांगला देश टेलिव्हिजन यांच्यात एकमेकांना सहकार्य करण्याचा महत्वाचा करार
ड अवकाश तंत्रज्ञानात सहकार्य करण्याचा आणि एकमेकांना साहाय्य करण्याचा दोन्ही देशांच्या संस्थांमध्ये करार