वृत्तसंस्था/ लखनौ
2005 मध्ये बसपाचे माजी आमदार राजू पाल यांच्या हत्येप्रकरणी लखनौ येथील विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी सात जणांना दोषी ठरवले. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) 2016 मध्ये या प्रकरणाचा तपास हाती घेतला होता. लखनौच्या विशेष सीबीआय न्यायाधीशांनी रणजीत पाल, आबिद, फरहान अहमद, इसरार अहमद, जावेद, गुल्हासन आणि अब्दुल कवी यांना गुन्हेगारी कट रचणे आणि इतर गंभीर आरोपांसह हत्येसाठी दोषी ठरवले. आरोपी फरहान अहमदला भारतीय शस्त्रास्त्र कायद्यांतर्गतही दोषी ठरवण्यात आले आहे.
या प्रकरणात कुख्यात डॉन-राजकारणी बनलेला अतिक अहमद देखील आरोपी होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अतिक अहमद, त्याचा भाऊ आणि मुख्य आरोपी खालिद अझीम उर्फ अश्र्रफ आणि गुलबुल उर्फ रफिक यांच्यावरील कारवाई त्यांच्या मृत्यूनंतर थांबवण्यात आली, असे त्यांनी सांगितले. राजू पाल यांची पत्नी पूजा पाल हिने न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले. परंतु आरोपींना फाशीची शिक्षा द्यायला हवी होती, असेही स्पष्ट केले. ‘मी न्यायालयाच्या निर्णयावर समाधानी आहे. परंतु एका आमदाराची दिवसाढवळ्या हत्या करण्यात झाल्याच्या या प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा द्यायला हवी होती, असे तिने सांगितले.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील बहुजन समाज पक्षाचे (बीएसपी) नेते राजू पाल यांची 25 जानेवारी 2005 रोजी अतिक अहमद याचा भाऊ अशरफ याच्याशी राजकीय वैर असल्याने गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. 2004 मध्ये प्रयागराज पश्चिम येथील पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर हे प्रकरण राजकीयदृष्ट्या चिघळले होते. 2002 मध्ये अतिक अहमद याच्याकडून बसपा नेते निवडणुकीत पराभूत झाले होते, परंतु लोकसभेवर निवडून आल्यानंतर त्यांनी ती जागा सोडल्यानंतर पाल यांनी पोटनिवडणुकीत अशरफ याचा पराभव केला होता.