मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती : सर्व प्रकरणांची एसआयटीमार्फत चौकशी
प्रतिनिधी / पणजी
सरकारी जमिनी लाटून इतरांच्या जमिनीदेखील बळकावल्याची सुमारे 70 प्रकरणे पोलिसांत नोंद असून त्यांची एसआफटीमार्फत चौकशी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
गोव्यातील अनेकजण विदेशात स्थायिक झाले असून ते सहसा गोव्यात येत नाहीत. ते आले तर केव्हातरी येतात. त्यांच्या जमिनी खोटी कागदपत्रे करून काही जणांनी ताब्यात घेतल्या असून आपल्या नावावरही केल्याची प्रकरणे त्यात समाविष्ट असल्याचे मुख्यमंत्री डॉ सावंत सांगितले.
पेडणे, बार्देश, तिसवाडी, सासष्टी या तालुक्यात हे प्रकार मोठय़ा संख्येने असून इतर तालुक्यातही असे घडलेले आहेत. ही सर्व प्रकरणे आता एसआयटीच्या ताब्यात देण्यात येतील, असे डॉ. सावंत म्हणाले.
लोकांनी तक्रारी देण्यास पुढे यावे!
लोकांनी अशा प्रकरणांच्या तक्रारी पुराव्यासह देण्यासाठी पुढे यावे. लोकांनी तक्रारी दिल्यास त्यांची चौकशी करणे शक्य होईल. अशी कृत्ये करणाऱयांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा डॉ. सावंत यांनी दिला आहे, या प्रकरणांबाबत सरकार गंभीर असून ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.